राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला बांधून हातात तलावर घेऊन शत्रूशी लढणारी वीर रणांगणा. याच लढवैय्या आणि धाडसी राणीची कथा अभिनेत्री कंगणा रणौत रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाता ट्रेलर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर यामधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'मणिकर्णिका.'मधील 'भारत ये रहना चाहिए' हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यातून देशाप्रतीचं प्रेम म्हणजे काय असतं हे स्पष्टपणे जाणवत आहे. ‘देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए.’ असे बोल असलेलं हे गाणं प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी शब्दबद्ध केलं आहे. सैन्य दिनाचं औचित्य साधून हे गाणं भारतीय लष्कराला समर्पित प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणापासून ते त्यांनी लढलेल्या लढाईपर्यंतचा जीवनप्रवास थोडक्यात दाखविण्यात आला आहे. दरम्यान, या गाण्याच्या प्रदर्शनानंतर प्रसून जोशी यांनी #देशप्रेमजताओ, #DeshPremJatao हा नवा हॅशटॅग सुरू केला आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं देशप्रेम व्यक्त करायचं आहे. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी गाणं लिहून,गाऊन,फोटोच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्याख्या या माध्यमाचा वापर करता येईल असं म्हटलं आहे. कंगणाचा हा आगामी चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.