कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. भरत जाधवने साकारलेली विठ्ठलाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, आता आता मालिकेत नवा अध्याय सुरु झाला आहे. विठ्ठल– रखुमाईच्या संसारगाथेनंतर आता प्रेक्षकांना संत तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व ऐकायला मिळत आहे. अशा या मालिकेत लवकरच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही संतमंडळीदेखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मुख्य म्हणजे अभिनेता सौरभ गोखले 'तू माझा सांगाती' मालिकेतून पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतपरंपरा लाभलेल्या भूमितील एका मोठ्या संताची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल खुद्द सौरभही फार आनंदात आहे. याविषयीच सांगताना तो म्हणाला, "याआधी 'आवाज' मालिकेमध्ये मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी प्रेक्षकांनी माझ्या प्रयत्नांना दाद दिली होती. लाखो प्रेक्षकांच्या हृदयात वसलेल्या या थोर व्यक्तिमत्वाची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी अत्यंत जबाबदारीची आणि अवघड कामगिरी आहे. मुख्य म्हणजे ही जबाबदारी मी फक्त दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्यामुळेच पेलू शकलो होतो. त्यानंतर आता पुन्हा 'तू माझा सांगाती' या मालिकेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारण्याची संधी मिळणं ही माझ्या कामाची पोचपावती मिळण्यासारखच आहे. प्रेक्षकांच्या मनातील ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लावता पडद्यावर ती भूमिका साकारण्यालाच माझं प्राधान्य असेल. किंबहुना ही भूमिका साकारताना महत्त्वाच्या जबाबदारीची जाणीव मनात ठेऊनच मी ती साकारेन.” पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण. मालिकेतील या नव्या वळणामुळे पुन्हा एकदा संतपरंपरेची झलक पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यासोबतच संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांमध्ये असणारा समजुतदारपणा, त्यांची विठ्ठलभक्तीही अनेकांना अनुभवता येणार आहे.