केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं फळ खायला देऊन निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी अभिनेता सुबोध भावेने संताप व्यक्त केला आहे. माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय अशा शब्दांत सुबोध भावेने घटनेचा निषेध केला असून कडक कारवाई केला जावी अशी मागणी केली आहे. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे असं स्पष्ट मत सुबोध भावेने मांडलं आहे. सुबोध भावेने ट्विट करत म्हटलं आहे की, "ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो, त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे". ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो,त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे.#hathimeresathi — Subodh Bhave (@subodhbhave) June 3, 2020 केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात स्थानिक गावकऱ्यांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे समोर आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर एकच हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचाा शोध सुरु केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण ? केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा स्फोट इतका मोठा होता की हत्तीणीच्या जीभ आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. एकही घर तिने तुडवलं नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली.” मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडला आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिलं असेल असा अंदाज मोहन क्रिश्नन यांनी व्यक्त केला आहे.