आताच्या फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या नव्या पिढीला चाळीत राहण्याची गंमत अनुभवायला मिळालेली नाही. त्यामुळे हल्लीच्या पिढीला या सर्व वातावरणाविषयी कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. अभिनेता उपेंद्र लिमयेच्या मुलाला चाळीत राहावसं वाटू लागलं आहे. याचे कारण आहे त्याच्या बाबांची मालिका ‘नकुशी’. सध्या उपेंद्रचा मुलगा त्याच्याकडे चाळीत राहण्याचा आग्रह करतो आहे. मूळचा पुण्याचा असलेल्या उपेंद्रचं बालपण सदाशिव पेठेतल्या वाडा संस्कृतीत गेलं. त्याच्या मुलाशी गप्पा मारताना तो पुण्यातल्या वाड्याच्या बिऱ्हाडांच्या गमतीजमती सांगायचा. सध्या स्टार प्रवाहवरील 'नकुशी' मालिकेतील उपेंद्र लिमयेची रणजित शिंदे ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील 'बग्गीवाला चाळ' आणि त्यातील मजेशीर व्यक्तिरेखा पाहता या मालिकेत चाळीचीही एक वेगळीच अशी भूमिका आहे. मुख्य म्हणजे यामुळे उपेंद्रच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून, ही चाळ पाहून उपेंद्रच्या मुलाला चाळीतल्या जीवनाचं कुतूहल वाटू लागलं आहे. त्यातून त्यानं 'बाबा, आपण चाळीत राहूया ना' असं उपेंद्रला सांगितलंय. 'चाळीतल्या दिवसांची मजा शब्दांत सांगता येणार नाही. आता मी फ्लॅटमध्ये राहात असलो, तरी चाळीचे दिवस विसरता येत नाही. बग्गीवाला चाळ पाहून माझ्या मुलाला चाळीची गंमत कळली आहे. त्याला चाळीत रहावंसं वाटतंय, तो मला तसं सांगतही असतो, याचा मला आनंद वाटत आहे,' असं उपेंद्र लिमयेने सांगितलं.