एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'वागले की दुनिया'. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री भारती आचरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यामुळेच या मालिकेच्या निमित्ताने भारती आचरेकर यांची खास मुलाखत. प्र. पुन्हा एकदा वागले की दुनियामध्ये काम करताना कसं वाटतंय? उ. मला खूपच आनंद झाला आहे, कारण १९८८ मध्ये मालिका प्रथम प्रसारित झाल्यापासून ३३ वर्षे उलटून गेली आहेत. मालिकेला अभूतपूर्व यश मिळाले,ज्याबाबत आम्ही खूपच समाधानी होतो. कोणाचीही आर.के. लक्ष्मण यांच्या लेखनासंदर्भात आव्हान पत्करणाची हिंमत नव्हती. पण, जेडी मजेठिया नवीन 'वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से'साठी त्यांची कल्पना व कथेसह माझ्याकडे आले आणि मला आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर यापूर्वीदेखील मी त्यांचं काम पाहिलं आहे. त्यामुळे या नव्या मालिकेतदेखील ते तितक्याच ताकदीने काम करतील याची खात्री होती. प्र. प्रेक्षकांना या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळेल? उ. काही नातेसंबंध कधीच बदलत नाहीत. त्यामुळे या मालिकेतदेखील फारसा बदल नाहीये. माझं आणि अंजनचं नातं प्रेक्षकांना विशेष आवडतं. त्यामुळे या मालिकेतही ते पाहायला मिळेल. फरक फक्त इतकाच आहे की आमच्या नात्याला ४० वर्ष झाली आहेत. त्यामुळे या वयस्क वागळेंना प्रेक्षक स्वीकारतील अशी खात्री आहे. प्र. राधिका वागले नेमक्या कशा आहेत? उ. केमिस्ट्री व संस्कार तेच असणार आहेत, पण पती व पत्नीमध्ये काहीशी अधिक नोकझोक असणार आहे. भूमिकेमध्ये मोठा बदल होणार नाही, पण प्रेक्षकांना वयस्क झालेल्या वागलेंची भाषाशैली व आचरणामध्ये काहीसा बदल अनुभवायला मिळू शकतो. मी खात्री देऊ शकते की, सिनियर किंवा ज्युनिअर वागले व त्याच्या कुटुंबामधील संस्कारांमध्ये कोणताच बदल नसेल. या नवीन स्वरूपाचा महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे तीन पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. प्रेक्षकांना अधिक बदल पाहायला मिळणार नाहीत, कारण ते देखील त्यांच्या मुलांच्या बाबतीत त्याच समस्यांचा सामना करत असल्याने मालिकेशी जुडले जातील. प्र. वागले की दुनियाची मूळकथा आणि आताची कथा या दोघांमध्ये नेमका काय फरक पडला आहे? उ. सरत्या वर्षांसह बरेच बदल झालेले आहेत. सर्वात मूलभूत बदल म्हणजे पूर्वी एकच चॅनेल होते, पण आता शेकडो चॅनेल्स आहेत. इंटरनेट क्रांती घडून आली आहे. पाश्चिमात्य प्रभाव असलेल्या मालिकादेखील येत आहेत. म्हणून मला सांगावेसे वाटते की, सामान्य पुरूषासाठी दररोजची कृती बदलली आहे. ते कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणे, एकत्र प्रवास करणे आणि बचत करणे या गोष्टींना प्राधान्य देतात. यामधून बदललेल्या अनेक स्थिती व समस्या प्रकर्षाने दिसून येतात. प्र. आजच्या काळात एकत्र कुटुंबाच्या महत्त्वाबाबत तुमचे मत काय आहे? उ. खरं तर करोना काळात अनेक कुटुंब जोडली गेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावलेली नाही जवळ आली आहेत. मध्यंतरी विभक्त कुटुंबाचं प्रमाण वाढलं होतं. परंतु, या काळात नाती जवळ आली.माझ्या मते, लोक हळूहळू पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं पसंत करत आहेत.