कॉलेज आठवणींचा कोलाज : मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री शब्दांकन : मितेश रतिश जोशी मी सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे या महाविद्यालयातून माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. माझ्या आयुष्याची जडणघडण सलग पाच वर्ष कोणी जवळून पाहिली असेल तर ती माझ्या कॉलेजने. अकरावीला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याअगोदरच मी ठाम होते कॉलेजला जाईन तर सर परशुराम भाऊ महाविद्यालयातच. त्यामुळे कॉलेज सुरू होण्यापूर्वीच मी कला मंडळाच्या ऑडिशन देऊन नाटकाच्या तालमी सुरू केल्या होत्या. एस.पी. कॉलेजचा प्रवेश घेण्यासाठीचा कट ऑफ किती आहे याचा गहन अभ्यास करून मी दहावीला मोजून मापून अभ्यास करून पास झाले व सरतेशेवटी एस.पी.त गेले. अकरावीला कॉलेज सुरू होण्याच्या एक महिना आधीपासून मी प्रबोधनकार ठाकरे करंडकसाठी नाटकाच्या तालमी करत होते. बॅक स्टेज आर्टिस्टपासून माझी सुरुवात झाली. मग मला एका नर्सचा छोटासा रोल मिळाला. हे माझं पहिलं नाटक. याच नाटकातल्या प्रमुख अभिनेत्रीने आयत्या वेळी नाटक सोडल्याने तिच्या जागेवर मी आले. आणि या भूमिकेसाठी मला प्रथम पारितोषिक मिळालं आणि नाटकाला दुसरं. इथून सगळी जडणघडण सुरू झाली. अकरावीला तीन नाटकं केली. बारावीला पुरुषोत्तम करंडकमध्ये सहभागी झालो. पण ते नाटक भयंकर फसलं. समोरच्या चार रांगा नाटक चालू असतानाच उठून गेल्या. इतकं नाटक फसलं. चौदावीला असताना आमच्यावर कोण प्रेम करणार ही एकांकिका केली. पु.ल. देशपांडे करंडकला मला वैयक्तिक पारितोषिक या नाटकातल्या भूमिकेसाठी मिळालं. चौदावीला असताना कला मंडळातल्या प्रमुखांशी माझे वाद झाले व मी कला मंडळ त्या वर्षी सोडलं. मग मी इतर कॉलेजमध्ये जाऊन नाटक बसवू लागले. चौदावीच्या वर्षी मात्र कॉलेजचा कला मंडळचा चमू जिथे जाईल तिथे माती खाऊन यायचा. सगळीकडे अपयश पदरी आल्यावर पंधरावीला मी पुन्हा कला मंडळात आले व कॉलेजचे नाव वर आणण्यासाठी एकांकिका दिग्दर्शित करू लागले. पोपटी चौकट नावाची एकांकिका मी केली. या एकांकिकेने आमच्या व कॉलेजच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणले. या नाटकात माझ्यासोबत सिद्धार्थ चांदेकर होता. पोपटी चौकटने पुरुषोत्तम करंडक, गडकरी करंडक, सवाई,पु.ल. देशपांडे करंडकवर विजयाची मोहर उमटवली. पोपटी चौकट या नाटकाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. त्यानंतर कंडिशन्स अप्लाय नावाची एकांकिका केली. या एकांकिकेने सकाळ आणि फिरोदिया करंडक पटकावला. १२ वैयक्तिक पारितोषिके फिरोदिया करंडकमध्ये आम्हाला मिळाली. कॉलेजमध्ये असताना जेवढं मी नाटकाकडे लक्ष दिलं. तेवढंच मी कथककडेसुद्धा लक्ष दिलं. दिवसातले पाच तास कथक व आठ तास नाटक करायचे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे. तिकडे पारितोषिक पटकवायचे. कॉलेजमध्ये घट्ट मैत्री असलेली माझी एकही मैत्रीण किंवा मित्र नाही. कारण ते जेव्हा टाइमपास करायचे. तेव्हा मी कथक करायचे. पण सिद्धार्थ चांदेकर हा प्राणी अपवाद ठरला. माझ्या घरी नाटकाच्या तालमी व्हायच्या तेव्हा सगळ्यात पहिले सिद्धू फ्रिज उघडून माझ्यासाठी बाबांनी आणलेली सगळी चॉकलेट ढापून मित्रांमध्ये वाटून टाकायचा. त्यामुळे त्याच्या सोबतची मस्ती ही काही निराळीच होती. माझ्या कॉलेजच्या आजूबाजूला खवय्येगिरी करण्यासाठी बरेच अड्डे होते. वेगवेगळ्या टपरीवर जाऊन मी चहा प्यायचे. एस एसचा वडापाव, कच्ची दाबेली, भेळ हे तर नेहमीचेच. तालमीला जाण्याच्या अगोदर आम्ही उदयविहारला जमायचो व उपिट आणि ताकावर ताव मारायचो. पंधरावीला माझ्याकडे चांगला मोबाइल होता. शेवटच्या पेपरच्या दिवशी सगळ्यांची मी मुलाखत घेतली. कसं वाटतंय कॉलेज सोडताना. आणि ते मी माझ्या मोबाइलमध्ये शूट केलं. खूप नाचलो. खूप दंगा केला. निकालाच्या दिवशी मला कला मंडळातल्या सदस्यांनी दगड फेकून मारलं. कारण मला ७२ टक्के होते. आणि बाकीच्यांना ५० टक्क्यांच्या खाली होते. संपूर्ण वर्ष मीसुद्धा त्यांच्या सोबत नाटय़साधनाच केली होती. तरीही मला चांगले मार्क होते. त्यामुळे त्यांचा सगळा राग माझ्यावर निघाला. माझ्या गाडीवर गद्दार, चिटर असे शब्द लिहिले. त्यामुळे कॉलेज सोडताना हसत हसत बाहेर पडले. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी पुन्हा सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.कॉम. करत करत मी एकांकिका पण केल्या. बाहेर ऑडिशन दिल्या. सिलेक्ट झाले. एकाच वेळी कुंकू व अग्निहोत्र या मालिका मिळाल्या. डे नाईट शिफ्ट चालू झाले. कॉलेज मागे पडलं. निर्मात्याने थेट पेपरच्याच दिवशी सुट्टी दिली. अभ्यासाला वेळच मिळाला नाही. पेपरच्या दिवशी अभ्यास काहीच झाला नव्हता. त्यामुळे शांत झोपले. एम.कॉम. राहील ते राहीलच. पण दिग्दर्शिका, अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून उदयास आले ते केवळ आणि केवळ कॉलेजमुळेच.