अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता बराच काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारणं स्पष्ट झालं नाही. मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस कामात दिरंगाई करत असल्याचं म्हणत अनेकांनी ताशेरे ओढले आहेत. अलिकडेच अभिनेत्री तनुश्री दत्तानेदेखील मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. परंतु, आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुंबई पोलिसांना पाठिंबा देत आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे असं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. अनेक नकारात्मक बातम्या त्यांच्याविषयी सुरु आहेत. म्हणूनच केदार शिंदे यांनी नकारात्मक बातम्या करणाऱ्यांवर आणि पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत.

“आता बास्स झालं.. @MumbaiPolice. तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी negative बातम्या सुरू आहेत. कुणीही येतय आणि टिकली वाजवून जातय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या #SushantSinghRajputDeathCase प्रकरणाचा समारोप करा!!!! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. @CMOMaharashtra”, अशी पोस्ट केदार शिंदेने शेअर केली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी तपास करण्यास दिरंगाई लागत आहे. त्यातच आता या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी बिहार पोलीसदेखील मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक जण मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढत आहेत. यावर मात्र आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे आणि गर्वदेखील असं म्हणत केदार शिंदेने मुंबई पोलिसांना पाठिंबा दिला आहे.