२०२१ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र, २०२० मधील कटू अनुभव कोणताही व्यक्ती विसरु शकणार नाही. गतवर्षात अनेकांना संकटांचा सामना करावा लागला. करोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटामुळे अचानकपणे लॉकडाउन घोषित करण्यात आला आणि याचा विपरीत परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला. यातून कलाविश्वदेखील सुटू शकलं नाही. जवळपास ५-६ महिने चित्रपटसृष्टीतील कामकाज ठप्प होतं. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांसोबतच या संपूर्ण इंडस्ट्रीला त्याचा चांगलाच आर्थिक फटका बसला. मात्र, सध्या कलाविश्वाची ही स्थिती स्पष्टपणे दिसत असली तरीदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजन विश्वाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळेच नितीन वैद्य यांनी २००५ ते २०१५ या वर्षातील आढावा घेतला आहे. त्यानुसार, १० वर्षांमध्ये कलाविश्वाला एकंदरीत किती कोटींचा आर्थिक फटका बसला हे त्यांनी सांगितलं आहे.

नितीन वैद्य यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत कलाविश्वातील आर्थिक उलाढालींचा एकंदरीत अंदाज घेतला आहे. त्यानुसार, गेल्या दशकभरात मराठी कलाविश्वाला जवळपास ४०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. या पोस्टसोबतच त्यांनी आकडीवारी स्पष्ट करणारा एक तक्ता (टेबल) शेअर केला आहे. त्यानुसार, चित्रपट, नाटक,संगीतक्षेत्र, लोककला या सगळ्यांना २००५ ते २०१५ या वर्षामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे.

ही पोस्ट शेअर करत त्यांनी कलाविश्वाचं सध्याचं स्वरुप, या क्षेत्रापुढे उभा असलेल्या अडचणी, त्यावरील उपाय सांगितले आहेत. सोबतच सरकारकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे हेदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा :‘त्या’ घटनेनंतर तब्बल ६ महिने विद्याने आरशात पाहिला नाही चेहरा; कारण वाचून बसेल धक्का

दरम्यान, या दशकात निर्मिती व प्रदर्शन यावर एकूण ₹६०३.२० कोटी रूपये गुंतवले गेले व निर्मात्यांच्या हाती १६२.१८ कोटी रूपयांचे उत्पन्न आले. म्हणजे मराठी चित्रपट उद्योगाचा या दशकातला तोटा ४४१.०२ कोटी रूपये इतका होता. पण याच दशकात एक सकारात्मक पाऊल पडले. मराठी भाषेतील खाजगी प्रादेशिक वाहिन्या याच दशकात उदयाला आल्या, त्यांच्यात निकोप स्पर्धा झाली आणि त्यातून मराठी मनोरंजन व्यवसायाला बाजारचलित अर्थव्यवस्थेचे पाठबळ उभे राहिले आणि चित्रपटांच्या प्रक्षेपणाचे हक्क या वाहिन्यांनी निर्मात्यांकडून विकत घेण्यास प्रारंभ केला व मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत तयार झाला, असंही नितीन वैद्य यांनी म्हटलं आहे.