लोकसत्ता रेश्मा राईकवार

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गेल्या आठवडय़ात करण्यात आली. देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरैकार – अरबीक्कडलिंदे- सिम्हम’ या मल्याळम चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या वर्षी ‘भोसले’ या चित्रपटासाठी अभिनेता मनोज वाजपेयी आणि ‘असूरन’ या चित्रपटासाठी दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांना विभागून मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एक  नव्हे तर ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या दोन चित्रपटांसाठी कंगना राणावतने मिळवला आहे. देशभरातील विविध भाषिक चित्रपट, त्यातील कलाकार- तंत्रज्ञ- लेखक- दिग्दर्शकांचा गौरव करणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे महत्त्व चित्रपटसृष्टीत आजही कायम आहे. संपूर्ण देशातून आपल्या कलाकृतीचा सन्मान व्हावा हे प्रत्येक चित्रपटकर्मीचे स्वप्न असते. त्या स्वप्नपूर्तीच्या क्षणाची अनुभूती देणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठी चित्रपटांसाठी कायमच मोलाचा ठरला आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवण्यात मराठी चित्रपटकर्मी आघाडीवर राहिले आहेत. २०१९ मध्ये दहा मराठी चित्रपटांना विविध विभागांत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याही वर्षी आठ पुरस्कार मिळवत मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीतली घोडदौड सुरूच ठेवली आहे. मात्र के वळ स्वप्नपूर्ती नव्हे तर एक चित्रपटकर्मी म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटांना देशभरात सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांपासून विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, अशी भावना या वर्षी विविध विभागांत पुरस्कार मिळवणाऱ्या विजेत्यांनी व्यक्त के ली आहे. चित्रपटसृष्टीतील नेहमीच्या परिचित नावांपेक्षा काही वेगळे चेहरे या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमुळे रसिकांसमोर आले आहेत हे या पुरस्कारांचे वैशिष्टय़ म्हणता येईल.

एका वेगळ्या प्रयोगाला मिळालेली दाद

‘बाडरे’ ही एक वेगळी संकल्पना आहे, या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. त्यामुळे एका अर्थी आशयाच्या बाबतीत के लेला हा प्रयोग होता, मात्र हा प्रयोग करत असताना फक्त कलात्मक पद्धतीने किं वा रटाळ पद्धतीने न मांडता सर्वसामान्यांना पाहायला आवडेल, अशाच पद्धतीने हा चित्रपट आम्ही के ला. या प्रयोगाला राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपात दाद मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ठरावीक विभाग असतात आणि स्पर्धेत अनेक चित्रपट असतात, त्यामुळे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे; पण खऱ्या अर्थाने पटकथा, छायाचित्रण, संगीत, कला दिग्दर्शन, वेशभूषा या सगळ्याच बाबतीत परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या रूपाने एक स्वप्नपूर्ती झाली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांचीही पसंती मिळावी हे दुसरे स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. करोनाकाळातील र्निबधांमुळे चित्रपट प्रदर्शनात अडचणी आहेत. लवकरच या अडचणी दूर होऊन चित्रपट चित्रपटगृहांमधूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

भीमराव मुडे, दिग्दर्शक , चित्रपट बाडरे – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न पूर्ण

कला दिग्दर्शक म्हणून आजवर अनेक चित्रपटांमधून काम के ले आहे, मात्र ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचा अनुभव खूप वेगळा आणि काही शिकवून जाणारा होता. या चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आणि त्यांचे आयुष्य यांचे संदर्भ पाहता १८६५ चा काळ आत्ताच्या परिस्थितीत उभा करणं हे आमच्यासमोरचं आव्हान होतं. यासाठी आम्हीही संशोधन के लं. दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे संशोधन- त्यांचा अभ्यासही खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून तो काळ उभा करण्याचा अनुभव हा समृद्ध करणारा होता. ‘आनंदी गोपाळ’सारखे चित्रपट समाजाला काही विचार देऊन जातात, त्यामुळे ते लोकांच्या लक्षात राहतात. अशा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होता आलं आणि इतक्या कमी वयात के लेल्या कामाची राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने दखल घेतली गेली याचा खूप आनंद वाटतो.

नीलेश वाघ –  सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – आनंदी गोपाळ

मराठीसाठी मिळालेला सन्मान बहुमोलाचा

आत्तापर्यंत कला दिग्दर्शक म्हणून खूप हिंदी चित्रपटांसाठी काम के लं आहे, मात्र मराठीत ‘आनंदी गोपाळ’ धरून पाचएक चित्रपटच के ले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान बहुमोलाचा वाटतो. या चित्रपटासाठी स्वातंत्र्यपूर्व १८६५ चा काळ उभा करायचा होता. खरं तर असा चित्रपट करायचं म्हटलं तर फक्त संशोधनासाठी पाच ते सहा महिने घेतले जातात, मात्र मला संशोधनासाठी फक्त २० दिवस मिळाले होते. या २० दिवसांत मी आनंदीबाईंचे व्यक्तिमत्त्व अभ्यासण्यापासून अनेक संदर्भ शोधून काढले. माझ्या टीमने दिवसरात्र एक करत मिळालेल्या दिवसांत संशोधन पूर्ण के ले. इतक्या मेहनतीतून उभारलेलं हे विश्व लोकांच्या पसंतीस उतरलं. मराठी इंडस्ट्री, मराठी रसिकांनी आपल्या कामाचं कौतुक केलं, याचा मला आनंद आहे.

सुनील निगवेकर, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – आनंदी गोपाळ

लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, माझंही होतं. इतक्या लहान वयात हे स्वप्न पूर्ण झालं याचा अर्थातच आनंद झाला आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव वाढली आहे. ‘बाडरे’ हा माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. ग्रामीण भागातली ही गोष्ट. बाडरे म्हणजे स्वप्न बघणं आणि ते प्रत्यक्षात येणं यामधला टप्पा असा त्याचा अर्थ होतो. हे गाणं अहिराणी भाषेतलं आहे. मी पहिल्यांदाच या बोलीभाषेत गाणं गायलं. श्वेता पेंडसे या तरुण अभिनेत्री- कवयित्री- लेखिकेने हे गाणं लिहिलं आहे आणि संगीतकार रोहन रोहन यांनी ते संगीतबद्ध के लं आहे. या गाण्याचा भावार्थ, संगीत हे सगळंच वेगळं आहे याची जाणीव मला होती; पण इतक्या छोटय़ा स्तरावर म्हणजे संगीतकार रोहन रोहन यांच्या घरातच हे गाणं आम्ही ध्वनिमुद्रित के लं होतं. या गाण्याने आज मोठा मान मिळवला आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रत्येक गोष्टीशी जोडली गेलेली होती. त्यामुळे गाण्याच्या प्रक्रियेतही दिग्दर्शक भीमराव मुडे यांचा सहभाग होता. या सगळ्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लागली आहे. लवकरच मी पंजाबी आणि मल्याळम भाषेतील गाणी रसिकांसमोर आणणार आहे.

सावनी रवींद्र,  उत्कृष्ट पाश्र्वगायिका – चित्रपट बाडरे

खिसालवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एक दीड वर्षांपासून आम्ही या चित्रपटावर मेहनत घेतो आहोत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून याआधीच ‘खिसा’ने अनेक पुरस्कार मिळवले आहेत, मात्र राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद काही और आहे. आपल्याकडे लघुपटांना फारसे महत्त्व दिले जात नाही, त्यांची दखल घेतली जात नाही. निर्मितीसाठी आर्थिक पाठबळही मिळत नाही. ‘खिसा’ करताना यात मी कोणतेही मोठे कलाकार घेतले नाहीत, पण मी जी गोष्ट सांगणार आहे तीच खरी स्टार आहे, हा विश्वास माझ्या मनात होता. तो या पुरस्काराने सार्थ ठरला आहे. कै लास वाघमारे यांनी लिहिलेली ही गोष्ट असून एका उत्तम टीमच्या मदतीने ती पडद्यावर साकारली आहे. पहिलाच चित्रपट ही एक जबाबदारी असते, या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिक वाढली आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरली आहे ती म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीय पुरस्कारांच्या मान्यतेला आजही खूप महत्त्व आहे. त्यामुळे ‘खिसा’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेक नामांकित ओटीटी कंपन्यांनी स्वत:हून चित्रपटासाठी संपर्क साधला असून लवकरच तो ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येईल.

राज कृष्णा मोरे , दिग्दर्शक – खिसा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण – कथाबाह्य़ विभाग

प्रेक्षकांना मराठी चित्रपटांपर्यंत आणण्याची सुवर्णसंधी

सामाजिक भान ठेवून चित्रपटनिर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा पुरस्कार म्हणजे या प्रयत्नाला मिळालेली दाद आहे. ‘आनंदी गोपाळ’सारखा ऐतिहासिक मूल्य-संदर्भ असलेला चित्रपट बनवणं तसं अवघडच काम आहे. त्यातले बारकावे, संदर्भ, त्यातून मांडायचा आशय नेमकेपणाने पोहोचणे आवश्यक असते. या सगळ्याच बाबींची दखल पुरस्कारामुळे घेतली गेली आहे. खरे तर, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे समाजावर जे सकारात्मक परिणाम झाले त्याचा आनंद आम्ही आधी अनुभवला आहे. या चित्रपटाच्या प्रभावामुळे ‘सिम्बॉयसिस महाविद्यालया’त के वळ मुलींसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. समाजावर पडलेला हा प्रभाव आनंददायी होता, राष्ट्रीय पुरस्कारामुळे हा आनंद दुणावला आहे.

मंगेश कुलकर्णी,  निर्माते एस्सेल व्हिजन, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट – आनंदी गोपाळ