'लय असत्याल मनमौजी, पण लाखात एक माझा फौजी' असं म्हणत 'लागिरं झालं जी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. मालिकेच्या प्रोमोपासून ते अगदी सध्या मालिकेत सुरु असणाऱ्या घडामोडींपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्रेक्षकांनी आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील प्रसंगांप्रमाणे महत्त्वं दिलं. अशा या लोकप्रिय मालिकेमध्ये आता सर्वांचा लाडका 'अज्या' म्हणजेच अजिंक्य आणि 'शीतली' म्हणजेच शीतल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. भांडण आणि रुसव्याफुगव्याने सुरु झालेल्या त्यांच्या या नात्याचा कुटुंबातील मंडळींनी स्वीकार केला असून, हे दोघंही आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांच्या लग्नामध्ये सहभागी होण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन अजिंक्य आणि शीतलच्या लग्नापूर्वीचे काही धमाल फोटो आणि त्यांच्या मित्रमंडळींचे गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. ज्यामध्ये लग्नाची खरेदी म्हणू नका किंवा मग पाहुण्यांच्या पंगतीला गोडाचा कोणता पदार्थ वाढायचा याविषयीचा वाद म्हणू नका. प्रत्येक लहानसहान गोष्ट आणि अज्या- शीतलचा हा धमाल प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. लग्नामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा उखाण्यासाठीही प्रेक्षकांची मदत घेण्यात येत असून, आता कोणता उखाणा घेत हे दोघं सहजीवनाच्या वाटेवर चालू लागतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट दरम्यान मालिका विश्वामध्ये सध्याच्या घडीला 'लागिरं.'चाच डंका वाजत आहे. अजय आणि शीतलच्या प्रेमकहाणीलाच देशप्रेमाची जोड देत गावाकडच्या पात्रांना या मानिकेच्या निमित्ताने एक वेगळीच लोकप्रियता प्राप्त झाली. एका गावाकडच्या तरुणाची संघर्षगाथा आणि त्यातून उमलणारी प्रेमकथा या साऱ्याची सुरेख बांधणी करत ‘लागिरं झालं जी’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यांच्या मनात घर करुन गेली.