झी मराठी या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठादेखील वाढल्याचं दिसून येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येत आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. सध्या या मालिकेमध्ये संभाजी महाराज यांच्या आयुष्यात दिलेरखान प्रकरण सुरु होण्यापूर्वी संभाजी राजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. असा उल्लेख अनेक पुस्तकांत आहे, तसे महाराजांचे एक पत्रही आहे. त्यामुळेच आता मालिकेत समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका दिसणार का ? याविषयी समर्थ भक्तांच्या मनात मोठे कुतुहल आहे. समर्थ रामदास स्वामींच्या शिवचरित्रातील भूमिकेविषयी अनेक मतमतांतरे असल्यामुळे हा टप्पा कशा पद्धतीने पडद्यावर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शुक्रवारी १३ जुलैला या भागाचा उलगडा होईल. आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं. या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.