आजच्या आधुनिक युगात तृतीयपंथी व्यक्ती दिसल्या की अनेक जण नाकं मुरडतात. त्यांची अवहेलना करतात. याच समाजाचा ते एक भाग असूनही त्यांना तो दर्जा मिळत नाही. त्यामुळे त्यांचं दु:ख, त्यांची तळमळ आणि एक व्यक्ती म्हणून दर्जा मिळावा यासाठी त्यांनी केलेली धडपड हे सारं ते आपल्यातले या लघुपटातून मांडण्यात आलं आहे.

सध्या देशावर करोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्याविषयी सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जण या आदेशाचं पालन करत आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून कोणताही आदेश नसताना किंवा कोणतंही संकट नसतानादेखील समाजातील अनेक जण एका वर्गांपासून सामाजिक अंतर बाळगून आहेत. तो समाज म्हणजे तृतीयपंथी. बऱ्याच वेळा तृतीयपंथीयांना डावललं जातं. त्यांची मस्करी केली जाते. म्हणूनच ते आपल्यातले या लघुपटातून त्यांचं मनोगत मांडण्यात आलं असून समाजातील ही दरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण कमळे यांनी केलं आहे. तर निर्मिती विघ्नेश जयस्वाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे या लघुपटात एका खऱ्याखुऱ्या तृतीयपंथी व्यक्तीने काम केलं आहे. विनी चौधरी असं तिचं नाव असून ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. मिनी मूळ वरळी येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, या लघुपटाचं दिग्दर्शन करणारे प्रवीण कमळे यांनी यापूर्वी ‘दगडी चाळ’ या चित्रपटासाठी संवाद लेखन केलं असून ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचं सह-दिग्दर्शनही केलं आहे.