|| निलेश अडसूळ

एकत्र कुटुंबात राहणे किंवा कुटुंबात एकत्र राहणे ही कला आहे. एकमेकांची मने राखत, सावरत जगताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधीतरी स्वत:चे ‘अस्तित्व’ बाजूला सारून इतरांचा विचार करावा लागतो. घराघरातली हीच कसरत आपल्याला छोट्या पडद्यावर दिसते म्हणूनच त्या मालिका जिव्हाळ्याच्या वाटतात. येता आठवडा असाच काहीसा आहे. नाती सांधण्याचा.  नात्यांचा कस लागेल असे काही प्रसंग नायक आणि नायिकांच्या आयुष्यात येणार आहेत. तसे ते नेहमीच येत असतात, फक्त यंदा रंजकता अधिक असणार आहे. रागरुसवा, मतभेद, वाद, विकोप, तंटा आणि त्यातून संयमी भूमिका घेत सकारात्मकतेकडे वाटचाल अशा नात्यांच्या सूत्रात बांधलेले आगामी भाग चांगलेच प्रेक्षकप्रिय ठरणार आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेने तब्बल नऊ महिन्यांची उडी घेतली आहे. फौजदारकीच्या ट्रेनिंगला गेलेली संजीवनी आता थेट फौजदार होऊन परत आली आहे. दरम्यान घरातली परिस्थिती बरीच बदललेली दिसते. एरव्ही वाघासारखा सगळ्यांना भिडणारा सुजित आता भित्रा, सोशिक झाला आहे तर घरातला सगळा कारभार दादासाहेबांच्या हातात गेलेला आहे. अशात संजीवनीला आंबेगावचे पोलीस ठाणे आल्याने घरात सगळ्यांचे डोळे विस्फारले आहेत. सध्या संजीवनीला वरिष्ठ अधिकारी म्हणून गुलाब भोसले यांच्याशी सामना करावा लागणार आहे. गुलाब आणि रणजीत यांच्यातील तेढ संजीवनीच्या मार्गात अडथळे निर्माण करणार असे चित्र दिसते आहे. येत्या भागात पोलीस ठाण्यात दादासाहेबांच्या विरोधात तक्रार आल्याने संजीवनी त्यांना चौकशीसाठी बोलावते. त्यामुळे तिची प्रतिमा घरच्यांच्या लेखी अधिकच खालावणार आहे. सध्या सुजितमध्ये झालेला बदल, घरातले बदल या सगळ्यांचा शोध संजीवनी घेते आहे. त्यामुळे एकीकडे कौटुंबिक त्रास आणि दुसरीकडे कामाच्या ठिकाणी होणारा मनस्ताप अशा दुहेरी कसरतीला संजू तोंड देणार आहे.

तर याच वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत शंतनू आणि शर्वरीच्या लग्नाची खऱ्या अर्थाने तयारी सुरूआहे. जग्गूच्या आग्रहाने माधुरीने या लग्नाला होकार दिला असला तरी अद्याप तिने हे लग्न मनापासून स्वीकारलेले नाही. त्यामुळे या लग्नात विघ्न आणण्याचा ती प्रयत्न करणार यात काहीच शंका नाही. त्या कुरघोडी काय असतील हे आगामी भागात कळेलच, पण मेंदी, हळद, लग्नाचा माहौल याने मालिकेत चैतन्य येणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत अनुरागच्या येण्याने बरेच बदल जाणवत आहेत. सध्या शुभ्राचा आत्मविश्वाास परत आला असून तिने डीबीके फूड्स जॉइन केले आहे. तर दुसरीकडे शुभ्राची जागा घेण्यासाठी सुझॅन प्रयत्न करते आहे. सोहमच्या घरी येऊन शुभ्राला घराच्या बाहेर घालवून त्या घरावर राज्य करण्याची स्वप्नं सुझॅन पाहतेय. पण शुभ्रादेखील तिची खोड मोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सुझॅनला हे घर आपलेस करायचे असेल तर या घरातील सुनेची सर्व कामेदेखील करावी लागतील असे म्हणून शुभ्रा तिला कामाला जुंपते. आता सुझॅनची अक्कल ठिकाणावर येणार की ती पुन्हा शुभ्राला त्रास देण्यासाठी काही नवीन कारस्थान करणार हे आगामी भागात कळेल.

याच वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. देवीसिंग म्हणजेच डॉ. अजितकुमार देव याला एसीपी दिव्या सिंगने अटक केली आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे दिव्याचे लक्ष आहे. अजितकुमार सध्या कोर्टात स्वत:ची बाजू स्वत:च मांडतोय. येत्या भागात दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टातच सादर करणार आहे तर देवीसिंगला तुरुंगात धाडण्यासाठी सरकारी वकील आर्या देशमुख येणार आहेत. ही भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील करणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीचे नाते कसे टिकेल आणि अंकिताचे खरे रूप अभीला कधी कळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिरुद्ध घटस्फोटासाठी तयार नाही मात्र अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे संजनाचे काय हा प्रश्न जटिल झाला आहे. तर लग्नासाठी अंकिताने आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचले होते याचा तपास अभिषेक करणार आहे. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत.

याच वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये आता जीजी अक्कांना आपल्या सुनेची म्हणजेच कीर्तीची किंमत कळली आहे. आपल्या मुलाला नवी ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांनी कीर्तीचे आभार तर मानलेच पण तिचा मुलगी म्हणून त्या स्वीकार करणार आहेत. शुभम आणि कीर्तीला एकमेकांच्या प्रेमाची तर जाणीव झालीच आहे, पण एकमेकांपुढे ते व्यक्त कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शिर्केपाटील कुटुंब सहलीसाठी निघाले आहे. खरंतर जयदीप गौरीला एकांत मिळण्यासाठी बाहेर पाठवण्याचा माईंचा बेत होता. मात्र जयदीपच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंबच फिरण्यासाठी निघते. खास बात म्हणजे शिर्केपाटील कुटुंबातील स्त्रियांना एरव्ही आपण साडीमध्ये वावरताना पाहतो. पण सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच या सगळ्यांचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. आनंदाच्या या वातावरणात बरेच खेळही रंगणार आहेत. त्यामुळे मालिकेचे पुढील भाग म्हणजे प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल.

ल्ल सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेतून उलगडत चाललेली अनोख्या प्रेमाची गोष्ट आता लग्नापर्यंत आली आहे. पण ही कथा काहीशी वेगळी असल्याने ऐश्वार्या आणि सूर्यभान यांचात लग्नानंतर प्रेम खुलत जाणार आहे. लग्नानंतर घरात स्थान मिळवले, पण घरातल्या माणसांच्या मनात ऐश्वार्या आपले स्थान कसे निर्माण करते हे दाखवणारा येत आठवडा असेल. या वळणावर ऐश्वार्या आणि सूर्यभान बाहेर गेले असताना काही गुंड ऐश्वार्याची छेड काढतात. त्यात ऐश्वार्याला दुखापत होते. तेव्हा सूर्यभान येऊन तिला वाचवतात. अशा या नियतीचा नव्या वळणावर ऐश्वार्या आणि सूर्यभान यांच्या मनातील अंतर मिटेल का, विशेष म्हणजे सूर्यभान यांच्या मनात पहिल्या बायकोचे स्थान दृढ असल्याने तिथपर्यंत ऐश्वार्या पोहोचेल का या प्रश्नांची उत्तरे आगामी भागात उलगडत जातील.

प्रत्येक वाहिनीवर, प्रत्येक मालिकेत उसवलेली नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी, तुटलेले सांधण्यासाठी नायिकांचे प्रयत्न सुरू आहेत. मग कधी एखादी नायिका कणखर होताना दिसेल, कधी हळवी तर कधी जबाबदार. घराघरातील प्रसंगांशी साधर्म्य साधणाऱ्या या कथांचा प्रेक्षक मात्र मनमुराद आनंद घेतील, या शंका नाही.