छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. कधीकाळी शांत, संयमी असलेल्या अरुंधतीमध्ये आता अमुलाग्र बदल झाला आहे. अरुंधती आता पूर्वपेक्षा बरीच खंबीर झाली आहे. स्वत:चे निर्णय ती स्वत: घेताना दिसत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मात्र, आता या मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रसंग घडणार आहे. अनिरुद्ध आणि संजना या दोघांच्या नात्याविषयी अरुंधतींला समजल्यानंतर तिने अनिरुद्धला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनिरुद्ध सध्या संजनासोबत राहत आहे. मात्र, संजनादेखील त्याच्याशी पूर्वीसारखी वागत नसून त्याच्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सध्या अनिरुद्धची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली आहे. स्वत:च्या चुकीमुळे एकटा पडलेल्या अनिरुद्ध सध्या मानसिकरित्या खचला आहे. विशेष म्हणजे याच काळात त्याच्या गाडीला अपघात झाल्याचं दिसून येत आहे. सतत अरुंधती, संजना, घर यांचा विचार करुन मानसिकरित्या खचलेल्या अनिरुद्धच्या गाडीला अपघात होतो आणि त्यात तो चांगलाच जखमी झाला आहे. परंतु, आता त्याच्या या संकट काळात त्याच्या मदतीसाठी अरुंधती येणार की संजना हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.