छोट्या पडद्यावरील ‘स्वामिनी’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. एका सामान्य मुलीचा राजकन्या बनण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेतून उलगडला जात आहे. त्यातच जानकीबाई आणि त्यांच्या बाळाचा अचानक झालेल्या मृत्युमुळे शनिवारवाड्यात दु:खाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच माधवरावांची तब्येतही ठीक नसल्यामुळे रमाबाई पुन्हा शनिवारवाड्यात परतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याने वाड्यातील वातावरण काहीअंशी बदलल्याचं दिसून येत आहे. यातच रमाबाईंना वाड्यामध्ये नवीन सवंगडीदेखील मिळाला आहे.

वाड्यावर शोककळा पसरली असतानाच रमाबाईंच्या येण्यामुळे काही वेळ का होईना वाड्यातील वातावरण बदललं आहे. त्यातच घरात माधवरावांचा लहान भाऊ नारायणरावही आहेत. त्यामुळेच रमाबाईंना वाड्यात परतल्यानंतर नारायणराव हा लहान सवंगडी भेटला आहे.

दरम्यान, वाड्यात रामचंद्र आणि रमाबाई यांच्यातील मैत्रीदेखील तितकीच गोड आहे. एकमेकांच्या खोड्या काढणे असो वा मस्ती करणे असो पण रमाबाईंना मात्र त्यांची अगदी भक्कम साथ मिळाली आहे. रामचंद्र रमाबाईंच्या सावलीसारखा बरोबर असतो.या मालिकेत सृष्टी पगारे, रमाबाईंची भूमिका साकारत आहे. तर रामचंद्रची भूमिका नित्या पवार वठवत आहे.