अमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर नाना विरुद्ध तनुश्री या नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. यापूर्वीही तिनं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं एका मुलाखतीत केला आहे.

#metoo मोहीमेबद्दल बोलताना तिनं नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं. #metoo मोहिम भारतात कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण लोक फक्त वादविवादाबद्दल बोलतात मात्र प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा लोक काहीच करत नाही असं ती म्हणाली. यावेळी तिनं ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान सेटवर तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच यावेळी केवळ बघ्याची भूमिका निभावली असंही ती म्हणाली.

नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असं तनुश्री ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी नानांसोबत काम करणं थांबवलं पाहिजे. जर मोठ्या कलाकरांनी महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अशा लोकांसोबत काम करणं सुरूच ठेवलं तर #metoo मोहिम कधीही यशस्वी होऊ शकत नाही असंही तनुश्री म्हणाली.

असभ्य वर्तन करणाऱ्या नानाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना गुंडाकरवी धमकावल्याचा आरोपही तिनं केला. तिच्या आरोपामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे.