छोटा पडदा
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

तीन महिन्यांपासून सुरू असलेला कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम अखेर रविवारी संपला. कोण जिंकणार, कोण हरणार या चर्चेलादेखील पूर्णविराम लागला. बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व असल्यामुळे कोण जिंकू शकेल याची खात्री नव्हती. पण त्याविषयी अनेक अंदाज बांधले जात होते. मेघा तिच्या स्पिरिटने खेळते म्हणून ती जिंकेल असं वाटत होतं तर पुष्करची जिद्द त्याला जिंकवेल असं वाटत होतं. स्मिताचा सच्चेपणा तिला विजेतेपदापर्यंत पोहोचवेल असं वाटत होतं तर आस्तादचं मराठी भाषेवरील प्रभुत्व त्याला शेवटपर्यंत नेईल असा अंदाज होता. हे सगळे अंदाज या पर्वाच्या शेवटच्या आठवडय़ात जास्त व्यक्त केले गेले.  अखेर रविवारी या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीचा निकाल लागला. मेघा धाडे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. मेघासोबत इतर अनेक तगडे स्पर्धक असताना मेघाच का जिंकली हे विचार करण्यासारखं आहे. तिच्यासोबत असेलेले हे स्पर्धक एकेक करून बाहेर पडले आणि विजेतेपदावर मेघाने तिचं नाव कोरलं.

‘मेघा खोटं वागते’, ‘मेघाला गेमपुढे काही दिसत नाही’, ‘मेघा शब्द फिरवते’, ‘ती प्रचंड अभ्यास करुन आली आहे’ असे अनेक आरोप तिच्यावर केले गेले. तिनेही या सगळ्या आरोपांना वेळोवेळी सडेतोड उत्तरं दिली. पहिल्या दिवसापासून स्पर्धा म्हणून त्याकडे कोणी बघत असेल तर ती मेघाच होती. तिचं धोरण पक्कं होतं. ‘हा खेळ आहे आणि मी तो जिंकण्यासाठीच खेळणार. खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा असतो. तेवढी जिद्द तुमच्यात हवीच. बिग बॉस मराठी या खेळासाठी अनेक लोक पडद्यामागे मेहनत घेत असतात. अनेक प्रायोजक कार्यक्रमाशी जोडले गेलेले असतात. ते इतकं करत असताना आम्ही मात्र हा खेळ गांभीर्याने घेतला नाही तर त्यांची सगळी मेहनत फुकट जाईल’, हे तिच्या डोक्यात अगदी पक्कं होतं.  सुरूवातीचे दोन आठवडे मेघाच्या प्रतिमेवर बोट रोखलं गेलं. पहिल्याच टास्कमध्ये जुई आणि स्मिता या दोन स्पर्धकांवर कचरा टाकल्यामुळे तिला टीकेला सामोरं जावं लागलं. पण ती खचली नाही. खेळत राहिली. प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली. एकदा ती एकटीही पडली पण तिने हार मानली नाही, की ती थांबली नाही.

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सईऐवजी आस्तादचं नाव घेतल्यामुळे तिला विश्वासघातकीही म्हटलं गेलं. पण ती तिच्या मतांवर ठाम होती. अंतिम फेरीत शेवटी ती म्हणाली की, मेंदू आणि मन यांची सांगड घालत संपूर्ण खेळात ती खेळली. एका भागात तिच्या गत आयुष्याबद्दल तिनेच सहस्पर्धकांना सांगितलं. तिच्या भूतकाळापेक्षाही तिचं त्या कार्यक्रमात जिद्दीने खेळणं प्रेक्षकांना जास्त भावलं. ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, टिकायचं आणि टीव्हीवर दिसायचं असेल तर सतत हॅपनिंग असायला हवं हे तिला चांगलं ठाऊक होतं. तिचा वावरही त्याच दृष्टितून होता. मेघा बिग बॉस हिंदीच्या सगळ्या पर्वांचे, सगळे भाग बघून चांगलाच अभ्यास करुन आली आहे असं तिच्याबद्दल नेहमी म्हटलं जायचं. यावर तिचं म्हणणं होतं, ‘सगळ्या स्पर्धकांचा या कार्यक्रमाशी असलेला करार किमान एक महिना आधी झाला आहे. म्हणजे त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी एक महिना होता. माझ्याकडेही तेवढाच वेळ होता. फरक इतकाच की त्यांनी अभ्यास केला नाही आणि मी केला, यात माझा दोष काय? एखाद्या नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालात तर थेट शूटिंग होताना स्टेजवर नाचता का? तर नाही. आधी गाणं ठरवता, तालीम करता मग शुटिंग होतं. म्हणजेच तुम्ही तुमचा अभ्यास करता. मीही तसंच केलं. बिग बॉस मराठी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये येताना मी माझा घरचा अभ्यास पूर्ण करुन आले. यात गैर काय आहे?’

मेघाला तिच्या खूप बोलण्यावरुनही टोकलं जायचं. ‘मेघा समोरच्याला बोलू देत नाही’ असा आरोप सतत केला जायचा. पण त्यावर ती बिनधास्त म्हणायची, ‘मी खूप बोलते हा माझा प्रॉब्लेम नसून तुमचा प्रॉब्लेम आहे.’ मेघा जिद्दीने खेळली आणि जिंकली. ‘मेघा धाडेला हरवायला जिगरा पाहिजे’ हे तिचं वाक्य अतिशय लोकप्रिय झालं. ती स्वत:च्या मतांवर नेहमी ठाम राहिली. ‘समोर दहा जण असोत, दहा हजार असोत किंवा दहा लाख, माझं मत हे माझंच मत असणार आहे’, असं ती सांगायची. दोन पावलं कधी आणि कुठे मागे यायचं आणि कधी कोणाला सॉरी म्हणायचं हे तिला पक्कं माहीत होतं. कदाचित हा सगळा तिच्या स्ट्रॅटेजीचा भाग असेल. पण त्यात गैर काहीच नाही. ती म्हणाली तसं हा खेळ आहे आणि तो खेळ म्हणून आणि जिंकण्यासाठीच खेळायचा असतो; त्यामुळे ती तिच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे पुढे गेली आणि जिंकली.
सौजन्य – लोकप्रभा