‘मी टू’ मोहीमेला पाठिंबा देतानाच अभिनेत्री रवीना टंडनने मला कधीही अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसल्याचे सांगितले. मात्र कामाच्या ठिकाणी मला मानसिक छळाचा सामना करावा लागला होता, अशी आठवण रवीनाने सांगितली.

रवीना टंडनने नुकतीच ‘मी टू’बाबत भूमिका मांडली. ती म्हणाली, मला कधीही लैंगिक छळाचा सामना करावा लागला नाही. मी लैंगिक छळ सहनही केला नसता. मी त्याच वेळी सडेतोड उत्तर देऊन तिथून निघून गेले असते. मात्र, लैंगिक छळाचा सामना करावा लागलेल्या तरुणींना किती त्रास झाला असेल याची मला कल्पना आहे, असे तिने सांगितले. ‘मी टू’तील महिलांचे अनुभव वाचून माझा राग अनावर होतो, असे तिने सांगितले.

रवीना पुढे म्हणाली, मला कामाच्या ठिकाणी मानसिक छळाचा सामना करावा लागला होता. काही पत्रकार महिला प्रतिमा मलिना करणाऱ्या बातम्या द्यायच्या. याद्वारे त्या अभिनेत्यांना मदत करायच्या. काही वेळेला महिलांनी त्यांच्या प्रियकराच्या किंवा पतीच्या मदतीने मला चित्रपटातून काढून टाकायला लावले होते. दुसऱ्यांना यश मिळत असल्याने त्या महिलांना राग येत असावा. पण ही पद्धत चुकीची आहे. अशा घटना टाळण्यासाठी चित्रपटासाठी करार करतानाच नियमांचा समावेश करणे गरजेचे आहे. जर एखाद्या अभिनेत्याला ठराविक अभिनेत्रीसोबत काम करायचे नसेल तर त्या अभिनेत्याने चित्रपट सोडावा. त्या अभिनेत्रीचे करिअर का उद्ध्वस्त करायचे?, असा सवाल रवीनाने विचारला. मात्र, तिने यासंदर्भात कोणाचेही नाव घेणे टाळले.

दरम्यान, यापूर्वीही रवीनाने तनुश्री दत्ता प्रकरणानंतर अभिनेत्रींना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे सांगितले होते. अभिनेत्रीने आवाज उठवल्यास ती कामात अडथळे आणत असल्याचा कांगावा केला जायचा. मनोरंजन क्षेत्रातील संपादकही निर्माते आणि अभिनेत्याला मदत करायचे. यासाठी त्यांना आर्थिक लाभ मिळत असावा किंवा त्यांना आणखी मोठी बातमी दिली जात असावी. पण महिलेविरोधात सगळेच एकत्र येतात. मनोरंजनच नव्हे तर अन्य क्षेत्रातील महिलांनाही हाच अनुभव येतो, असे रवीनाने म्हटले होते.