'मिर्झापूर २' या वेब सीरिजमधील एका दृश्यावरून वाद निर्माण झाला आहे. देशभरात प्रसिद्ध असणारे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी सीरिजमधल्या एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या पुस्तकाला सीरिजमध्ये चुकीच्या पद्धतीने दर्शविल्याचा आरोप पाठक यांनी केली आहे. त्या दृश्यामुळे पुस्तकाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते दृश्य सीरिजमधून न हटविल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाठक यांनी दिला होता. त्यानंतर आता 'मिर्झापूर २'च्या प्रॉडक्शन हाऊसने माफी मागत संबंधित पुस्तकाचं दृश्य सीरिजमधून हटवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकीकडे 'मिर्झापूर'ची पहिली सीरिज लोकप्रिय झाली असताना दुसरी सीरिज मात्र एकानंतर एक अशा वादात अडकतेय. या सीरिजमधील एका दृश्यात सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारणारे कुलभूषण खरबंदा हे हातात सुरेंद्र मोहन पाठक यांचं 'धब्बा' हे पुस्तक घेऊन बसतात. हे पुस्तक हातात घेऊन ते जे संवाद बोलतात, त्यावर पाठक यांनी आक्षेप घेतला आहे आणि ते त्वरित हटविण्याची मागणी केली आहे. pic.twitter.com/H37AfVxDPK — Excel Entertainment (@excelmovies) October 30, 2020 आणखी वाचा : मालदीवला पोहोचव म्हणणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचं भन्नाट उत्तर या वादानंतर एक्सेल एंटरटेन्मेंटने सीरिजमधून ते दृश्य हटविण्यात येणार असल्याचं सांगत सोशल मीडियावर माफिनामा प्रसिद्ध केला. तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा आमचा हेतू अजिबात नव्हता, असं त्यांनी माफिनाम्यात स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे तीन आठवड्यांत संबंधित दृश्यात बदल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.