गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट 'मिशन मंगल' आज १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो 'मिशन मंगल' या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी हे कलाकार झळकणार आहेत. मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना आहे. एका ऐतिहाासिक घटनेवर 'मिशन मंगल' हा चित्रपट आधिरित आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. २४ सप्टेंबर २०१४ मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या धाडसी सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली. चित्रपटाच्या सुरुवातीला २०१०मध्ये इस्रोमधील वैज्ञानिक राकेश धवन उर्फ अक्षय कुमार आणि मोहिच्या डायरेक्टर तारा शिंदे उर्फ विद्या बालन हे 'जीएसएलवी सी-३९' मोहिमेसाठी अफाट प्रय़त्न करताना दिसतात. या मोहिमेअंतर्गत ते एक रॉकेट लॉन्च करणार असतात. परंतु दुर्दैवाने त्यांचा हा प्रयत्न फसतो आणि ही मोहिम अयशस्वी होते. त्यानंतर अक्षय कुमारची मंगळ प्रकल्प विभागात नेमणूक करण्यात येते. विद्या तेथे होमसायन्सचा अभ्यास करत असते आणि दरम्यान तिला मंगळ मोहिमेची कल्पना सुचते. या मोहिमेसाठी अक्षय आणि विद्या इस्त्रोचे प्रमूख विक्रम गोखले यांना आश्वासन देतात. परंतु त्यांना इस्त्रोमधील इतर वैज्ञानिकांचा विरोध असतो. अक्षय कुमारचा आत्मविश्वास आणि आश्वासन पाहता त्याला ऐका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्ले (नित्या मेनन), परमेश्वर नायडू (शरमन जोशी) आणि एचजी दत्तात्रेय (अनंत अय्यर) या वैज्ञानिकांची टीम सोपवण्यात येते. हे सर्व वैज्ञानिक ही मोहिम यशस्वी होणार की नाही असा विचार करत असतात. दरम्यान विद्या बालन संपूर्ण टीमला अक्षय आणि तिच्यावर थोडा विश्वास दाखवण्यास सांगते. त्यांनतर सर्वजण मोहिमेवर लक्ष केंद्रीत करतात. या मोहिमेचे नाव 'मिशन मंगल' असे ठेवण्यात येते. सर्व वैज्ञानिकांच्या अफाट प्रयत्नानंतर ही मोहिम यशस्वी होते की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.