गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यानंतर डॅमसंपूर्ण भरल्याने डॅमचं पाणी सोडण्यात आलं आणि नद्यांना पुर आला. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तर रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे काही निष्पाप नागरिकांनी आपले प्राणही गमावले आहेत. चिपळूण, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हे पाहता शासन पातळीवर, स्वयंसेवी संस्थांकडून मदतकार्य तर सुरु आहेत. पण, इतरवेळी अशी काही परिस्थिती इतर राज्यांवर आली तर पुरग्रस्तांची मदत करा असं म्हणणाऱ्या सेलिब्रिटींनी महाराष्ट्राबाबती का केलं नाही? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारत बॉलिवूड सेलिब्रिटींना मदतीचे आवाहन केले आहे.

अमेय खोपकर यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. “इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो,” असं अमेय खोपकर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

तळई गावात दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा बळी गेला आहे. महाड आणि चिपळूण शहरांमध्ये पूर आला असून शहरं पाण्याखाली गेली आहेत. अनेक जण मलब्याखाली गाडले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचेही नुकसान झालेय. तर पुरात व भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व त्यांचं स्थलांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात १२९ च्या जवळपास लोकांचा बळी गेला आहे.