एका बॅगेत बॉम्ब असल्याची खोटी अफवा उठवत गुरुवारी मुंबई सहारा विमानतळावर एका महिलेनं मोठा गोंधळ उडवून दिला. यामुळे एअर इंडियाचे विमान सुमारे एक तास थांबवण्यात आले होते. २७ वर्षीय कांचन ठाकूर या मॉडेलनं आपल्या मैत्रिणीची बॅगेत बॉम्ब असल्याचं सुरक्षारक्षकांना सांगितले. ती मुंबईहून आपल्या मैत्रिणीसोबत दिल्लीला जात होती. बॅगेत बॉम्ब असल्याचे कळताच विमानतळावर एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ सुरु झाला.

या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांची देखील मोठी धावपळ झाली होती. मात्र, हे सगळं सुरु असतानाच कांचन ठाकूरनं आपण जोक करत असल्याचं सांगितले. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास तासभर खोळंबा झाला. तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे सामान विमानातून काढण्यात आले. त्यांना सध्या तरी मुंबईहून इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

तसेच आपल्या मनोरंजनासाठी प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या या माथेफिरु मॉडेलला ३ वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. मात्र, सध्या कांचन ठाकूर जामिनावर बाहेर आहे. या गोंधळामुळे सुरक्षारक्षकांनी तात्काळ सीआयएसएफच्या जवानांना पाचारण केले. त्यानंतर मॉडेलसह तिच्या तीन मित्रांना त्यांनी ताब्यात घेतले होते. या सर्व प्रकारामुळे तब्बल एक तास उशीरा विमानाने उड्डाण केले.

दरम्यान, सीआयएसएफने जवानांना ताब्यात घेतल्यानंतर कांचनने उलट त्यांच्याशी बराच वाद घातला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही दहशतवाद्यांना सहज जाऊ देता, पण मस्करी करणाऱ्यांना मात्र पकडता या मुद्यावर ती जवानांशी वाद घालत होती.
त्यानंतर सीआयएसएफने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मॉडेल कांचनवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिला तीन वर्षाची शिक्षा भोगावी लागू शकते.