– समीर जावळे

२०१८ हे वर्ष वेब सीरिजचं वर्ष होतं असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. कारण या वर्षात विविध App वर ढिगाने वेब सीरिज आल्या. मनोरंजनाचं माध्यम हे मोबाइल असू शकतं हे या वर्षानं आपल्याला शिकवलंच नाही तर त्याचं महत्त्वही अधोरेखित करून दाखवलं. वर्षभरात आलेल्या वेबसीरिजची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याच्याही पलिकडे कधीच निघून गेली आहे. काही वेब सीरिज या खरंच लक्षात राहिल्या. सुंदर होत्या, काही वेब सीरिज तितक्याश्या पसंतीस पडल्या नाहीत. वेब सीरिजमध्ये बॉलिवूडची दिग्गज मंडळी दिसू लागली आणि या डिजिटल माध्यमाचं महत्त्व सगळ्यांना किती कळलं आहे हा मुद्दाही पुढे आला. या वर्षातली सर्वात हिट वेब सीरिज ठरली ती सेक्रेड गेम्स! त्याशिवाय लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेअर फूट, गंदी बात, घौल, अपहरण, मिर्झापूर अशा अनेक वेब सीरिजची चांगलीच चर्चा रंगली. या ब्लॉमधून नजर टाकणार आहोत अशाच गाजलेल्या वेब सीरिजवर ज्याची चर्चा अजूनही सुरु आहे.

सेक्रेड गेम्स
गणेश गायतोंडे या मुंबईतल्या डॉनभोवती फिरणारी ही कथा आहे. त्याचा मुंबईतला उदय, इसा या दाऊदशी साधर्म्य साधणाऱ्या पात्राचा असलेला त्यातला वावर. सैफ अली खानने रंगवलेला सरदारजी इन्स्पेक्टर, नवाजुद्दीन सिद्दीकीने रंगवलेला गणेश गायतोंडे ही दोन मुख्य पात्रं आणि त्याशिवाय इतर सगळी पात्र लक्षात राहण्यासारखी होती. कुक्कू हे यातलंच एक पात्र. ट्रान्सजेंडरचं पात्र ज्या ताकदीनं कुब्रा सेठने साकारलं त्याला जवाब नाही. ही वेबसीरिज पाहिल्यावर आठवण आली ती शोले सिनेमाची. त्या सिनेमात जशी मनोरंजन, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा या सगळ्याची भट्टी जमली होती अगदी तसाच प्रभाव सेक्रेड गेम्सने पाडला. त्याचा पुढचा पार्ट कधी येणार याची उत्सुकता अजूनही शिगेला पोहचली आहे. गणेश गायतोंडेचं पहिल्याच भागात स्वतःवर गोळी झाडून स्वतःला संपवणं. सरताज सिंह (सैफ अली खान) यानं त्याच्या आयुष्यात येणारा गणेश गायतोंडे आणि त्याच्या येण्यामागची कारणं शोधत पुढे सरकणं हे सगळं इतकं उत्तम जमून गेलंय की आता पुढचा पार्ट कधी येणार याची प्रेक्षक वाट बघत आहेत.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या दोघांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, कुब्रा सेट, राजश्री देशपांडे, सुरवीन चावला, पंकज त्रिपाठी, जितेंद्र जोशी या सगळ्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिर्फ त्रिवेदी बचेगा! सुभद्रा की मौतने मेरे अंदर का हिंदू जगा दिया!, कभी कभी लगता है अपुनीच भगवान है! या आणि अशा अनेक डायलॉग्जने डिजिटल प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातला गणेश गायतोंडे आणि सरताज सिंग जेवढा भावला तेवढाच जितेंद्र जोशीने साकारलेला काटेकर हा हवालदारही. बंटीही चांगलाच लक्षात राहिला. तसेच यातली खासियत ठरली ती यामधली स्त्री पात्रं. कुक्कू, सुभद्रा, कांताबाई, मिक्की या सगळ्याच पात्रांनी त्यांच्या भूमिका चोख वठवल्या आहेत.

कहाँ लेके जाएगा? जन्नत.. चल. जन्नत तो मैं हूँ जिसे जन्नत देखनी होती है वो मेरे पास आते हैं असे म्हणत गायतोंडेची खिल्ली उडवणारी कुक्कू, तृतीय पंथीय आहोत हे गणेश गायतोंडेला समजते तेव्हा अस्वस्थ होऊन रडणारी कुक्कू, स्वतःला संपवून घेणारी कुक्कू या सगळ्या छटा कुब्रा सेटने ज्या ताकदीने साकारल्या आहेत त्याला जवाब नाही. जी गोष्ट कुब्राची तिच शालिनी वत्स या अभिनेत्रीची तिने कांताबाई साकारली आहे. अगर इस शहरमें रहना है तो डेरिंग कर असं सांगत जेव्हा ती गँगचा ब्रेन बनते किंवा बंटीला झापताना देवी होती है औरत हे पटवून देते तेव्हा तिच्यातली कणखर स्त्री दिसून येते. अंजली माथूर या रॉ ऑफिसरच्या भूमिकेत राधिका आपटेही अगदी परफेक्ट बसली आहे. तिचा तपास करण्याची पद्धत, तिला उलगडत जाणारं सत्य.. फिल्ड तुम्हारा है, डेस्क मेरा यहीं जताना चाहते हो ना म्हणतानाची तिची अस्वस्थता. सारं सारंकाही अभिनय आणि नजरेतून ती बोलली आहे. तिची डायलॉग डिलिव्हरीची स्टाइलही नेहमीपेक्षा हटके आहे. २५ दिवसात काय होणार? सरताज त्यापर्यंत पोहचणार का? त्रिवेदी खरंच वाचणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे रहस्य कायम ठेवल्याने ही सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.

लस्ट स्टोरीज
लस्ट स्टोरीज ही वेब सीरिज आहे ती म्हणजे समाजतल्या पाच स्त्रियांचं प्रतिनिधीत्त्व करणारी. या सीरिजचं कौतुक अशासाठी करावं लागेल कारण स्त्रीच्या लैंगिक भावना, ती कसा विचार करते? सेक्सकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, स्त्रीसुलभ मनाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या सीरिजमधून करण्यात आला आहे. अनुराग कश्यप, झोया अख्तर, दीबाकर बॅनर्जी, करण जोहर या चार दिग्गज दिग्दर्शकांनी चार विविध गोष्टी दाखवल्या आहेत. स्त्रीच्या मनात लैंगिकतेबद्दल असलेल्या कल्पना, तिच्या भावना, स्त्री पुरुष संबंधांबाबत विचार करण्याची तिची पद्धत हा या चारही गोष्टींचा समान धागा आहे. कालिंदी हे पात्र राधिका आपटेने साकारले आहे. कालिंदीचं लग्न झालंय, मात्र ती तेजसच्या (आकाश ठोसर) प्रेमात पडते. तेजस हा महाविद्यालीन मुलगा आहे. या दोघांमध्ये शरीरसंबंधही येतात. त्यानंतर कालिंदीचं आयुष्य कसं बदलतं? कोणत्या वळणवांरून प्रवास करतं काय काय घडतं याचं भावविश्व यात रेखाटण्यात आलं आहे. दुसरी कथा आहे सुधाची.. (भूमी पेडणेकर) सुधा एका घरात मोलकरीण म्हणून काम करते. त्याच घरात राहणाऱ्या मुलासोबत सुधाचे संबंध आहेत. अजितसोबत (नील भूपालाम) सुधा एकरुप झाली आहे तिला हे मनोमन वाटतं आहे की तो तिला फसवणार नाही, तिच्याशी लग्न करेल. मात्र त्याचं लग्न एका मुलीसोबत ठरतं. त्यानंतर सुधाचं स्वप्न कसं तुटतं, तिच्या मनात नेमक्या काय भावना निर्माण होतात त्या सगळ्याची ही गोष्ट आहे. त्यानंतर भेटीला येते ती रिना, सुधीर आणि सलमानची गोष्ट. रिना (मनिषा कोइराला) ही एक मध्यमवयीन महिला आहे. तिच्या नवऱ्याकडून असलेल्या लैंगिक सुखाच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे तिचे सुधीरसोबत (जयदीप अहलावत) अफेअर आहे. ती एका पॉइंटला सलमानला (संजय कपूर) म्हणते ही सलमान तुम्हे माँ चाहिये.. और मै तुम्हारी माँ नहीं बन सकती. सलमानला जेव्हा सगळ्या गोष्टी समजतात..तेव्हा काय घडतं त्यानंतर रिना काय निर्णय घेते? हे दाखवणारी रंजक गोष्ट आपल्याला समजते. त्यानंतर नंबर येतो तो करण जोहरच्या गोष्टीचा. पारस (विकी कौशल) आणि मेघा (कायरा अडवाणी) यांचे लग्न झाले आहे. मात्र जे चरमसुख मेघाला हवं आहे ते तिला मिळत नाही. तिला ते मिळतं एक सेक्सटॉय वापरून.. रेखा (नेहा धुपिया) तिला हे सेक्स टॉय देते. त्यानंतर तिच्या लैंगिक भावना कशा समोर येतात यावर विनोदी अंगाने भाष्य करणारी आणि बोल्ड संदेश देणारी ही कथा आहे. आपण रोज वावरतो त्या समाजात अशा ‘लस्ट स्टोरीज’ या असंख्य अगणित असू शकतात हे या चार गोष्टी शिकवून जातात.

लव्ह पर स्क्वेअर फूट
लव्ह पर स्क्वेअर फूट ही एक प्रेमकहाणी आहे. लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून अशी एक म्हण मराठीत आहे. या म्हणीच्या अगदी उलट या सीरिजमध्ये घडतं. संजय चतुर्वेदी (विकी कौशल) हा मुंबईतल्या चाळीत राहणारा मुलगा आहे. आपलं मुंबईत एक घर असावं हे त्याचं मुख्य स्वप्न. करीना डिसूझा (अंगिरा धर) त्याच्या आयुष्यात येते आणि हे दोघे घर पार्टनर व्हायचं ठरवतात. त्यांची ही स्टोरी किती आणि कशी वळणं घेते? त्या दोघांमधलं प्रेम कसं फुलतं हे या सीरिजमधून अनुभवता आलं. त्यामुळे हलकीफुलकी मानली गेलेली ही सीरिज नक्कीच विशेष आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

घौल
घौल ही राधिका आपटेची मध्यवर्ती भूमिका असलेली हॉरर वेब सीरिज. या वेब सीरिजमधले स्पेशल इफेक्ट पाहण्यासारखे होते. राधिका आपटेची मध्यवर्ती भूमिका आणि त्याला हॉररची जोड असे कॉम्बिनेशन या सीरिजमध्ये बघायला मिळाले. या सीरिजची चर्चाही चांगलीच झाली.

अपहरण
अपहरण या वेब सीरिजचा ट्रेलर आला आणि ही वेब सीरिज गाजणार हेच लक्षात आलं. या सीरिजची कथा उत्तराखंड आणि शेजारील राज्यात घडते. अरुणोदय सिंग, निधी सिंग, माही गिल या सगळ्यांच्या या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. अपहरण करून त्यानंतर चालणारे नाट्य यावर यात भाष्य करण्यात आलं आहे.

मिर्झापूर
सेक्रेड गेम्सनंतर चर्चेत राहिलेली मिर्झापूर ही देखील अशीच एक वेबसीरिज आहे ज्याच्या पुढच्या पार्टमध्ये नेमकं काय होणार? याची नेटकरी वाट बघत आहेत. गुड्डू, बबलू हे दोन भाऊ, अखंडानंद त्रिपाठी आणि त्याचा मुलगा मुन्ना या सगळ्यांभोवती ही कथा फिरते. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि राजकारण यांचा एकमेकांशी कसा घनिष्ठ संबंध आहे हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. अखंडानंद त्रिपाठी अर्थात कॉलिन भय्याच्या रोलमध्ये पंकज त्रिपाठी अगदी फिट बसला आहे. या सीरिजच्या सुरुवातीलाच एक प्रसंग दाखवण्यात आला आहे वरात सुरु असते. शहरातला गुंड अशी ख्याती असलेला मुन्ना या वरातीत सहभागी होतो हवेत अंधाधुंद गोळीबार करतो. गोळीबारात ज्याचे लग्न असते तो नवरदेवच गोळी लागून ठार होतो. यासंदर्भातली केस घेऊन ज्या वकिलाकडे नवरदेवाचे वडिल जातात, त्यांच्याच मुलांना अखंडानंद त्रिपाठी त्याच्या गँगमध्ये सामील करून घेतो. गुड्डू आणि बबलू हे दोन भाऊ मग मिर्झापूर कसे चालवतात? मुन्नाचं काय होतं हे सगळं पाहताना उत्तर प्रदेशातील भयंकर राजकारणाची जाणीव गडद होत जाते. गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमाशी या वेब सीरिजची तुलना आपोआपच होते. गँग्स ऑफ वासेपूर इतका नसला तरीही चांगला प्रभाव पाडण्यात ही सीरिज यशस्वी झाली आहे. या सीरिजच्या पुढच्या पार्टमध्ये काय होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

it’s not that simple

it’s not that simple ही वेबसीरिजही चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये स्वरा भास्कर, पुरब कोहली, विवान भटेना यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वरा भास्करचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही. स्वरा ही एक स्वतंत्र विचार करणारी महिला आहे. ती नवऱ्याच्याच ऑफिसमध्ये काम करत असते. मात्र एक दिवस नवरा तिचा बोर्ड मिटिंगमध्ये अपमान करतो आणि स्वरा कोसळते. त्यानंतर काय घडतं? ती विभक्त होऊन पुन्हा कशी संघर्ष करते हे दाखवणारी ही सीरिज आहे.

तर या झाल्या २०१८ मधल्या काही चांगल्या आणि चर्चेतल्या वेब सीरिज. या शिवाय ढिगाने वेब सीरिज आल्या आणि गेल्या. स्मोक, ब्रेथ, ऑफिशियल सीईओगिरी, इंजिनिअरींग गर्ल्स, द रियुनियन, गर्ल इन सिटी ही आणि अशी किती तरी नावं घेता येतील. या सगळ्या वेब सीरिजने आपलं मनोरंजन तर केलंच पण एक वेगळा विषय कशा पद्धतीने हाताळता येतो? सिनेमा हा फॉर्म न वापरता किती चांगल्या पद्धतीने १० ते १२ एपिसोड्समध्ये संपवता येतो हे दाखवून दिलं आहे.

समीर जावळे

sameer.jawale @gmail.com