सध्या कोणत्या विषयावर आपला चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडके ल याबद्दल निर्माते-दिग्दर्शक तसे साशंकच असतात. त्यामुळे कंडोमसारख्या विषयावर आधारलेल्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा, अशी अपेक्षा सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी व्यक्त के ली. दिग्दर्शक म्हणून आपल्यासाठी हा फार सुखद अनुभव होता, अशी भावना सतराम रामाणी याने व्यक्त के ली. अभिनेता अपारशक्ती खुराणा याची मुख्य भूमिका असलेला ‘हेल्मेट’ हा चित्रपट सध्या त्याच्या विषयामुळे खूप चर्चेत आहे. सतत वाढती लोकसंख्या ही आपल्या देशाची गंभीर समस्या आहे. याबद्दल सर्वकाळ चर्चा सुरू असते, मात्र हे थांबवण्यासाठी गावागावांतून कं डोम वा अन्य निरोध साधने वापरण्याबद्दल जनजागृती करणे हाच मार्ग असूनही त्यावर काही बोलले जात नाही. ‘हेल्मेट’मधून हा विषय हसतखेळत का होईना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे, असे सतराम सांगतो.

सतरामचा स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याने याआधी ‘जिस्म २’, ‘रमैया वस्तावैय्या’, ‘जय हो’सारख्या चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. जळगावमध्ये लहानाचा मोठा झालेल्या सतरामला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मराठी नाटकांपासून मिळाली असं तो म्हणतो. माझे वडील नेहमी मला आमच्याकडे होणाऱ्या मराठी नाटकांना आवर्जून घेऊन जायचे. वीस वर्षांपूर्वी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसताना ‘जाणता राजा’सारख्या भव्यदिव्य नाटकाचा झालेला प्रयोग हा माझ्या मनावर कोरला गेला आहे, असे त्याने सांगितले. व्यवस्थापन विषयातील शिक्षण पूर्ण करूनही त्यात मन रमेना, हे लक्षात आल्यानंतर त्याने पुण्यातून चित्रपट दिग्दर्शनाचे धडे घेतले. या अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळाल्यानंतर आपण योग्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे, याची खात्री पटली अशी आठवण त्याने सांगितली. मुंबईत आल्यानंतर साहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक अशा अनेक कामांमधून त्याने चित्रपटनिर्मितीचा अनुभव गाठीशी बांधला. स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर यायचे असेल तर आपला चित्रपट चांगल्या कथाकल्पनेवर बेतलेला हवा, याची खूणगाठ मनाशी बांधली होती. मित्रांशी सतत चर्चा करत असताना ‘हेल्मेट’चा विषय सापडला आणि मग पटकथा लिहून पूर्ण के ली, असे त्याने सांगितले. अर्थात, सामाजिक विषयावरच्या चित्रपटाला निर्मात्यांकडून आर्थिक बळ मिळेल का?, याबद्दल साशंकच होतो, असं तो म्हणतो. योगायोगाने ‘जिस्म २’ करत असताना त्याची अभिनेता-निर्माता दिनो मोरियाशी चांगली ओळख झाली होती. त्याने दिनोला चित्रपटाची कल्पना सांगितली, त्याला ती आवडली. मग पुन्हा व्यावसायिक चित्रपटाच्या दृष्टीने पटकथेची नव्याने बांधणी सुरू झाली, दिनोच्याच प्रयत्नातून निर्माता म्हणून सोनी पिक्चर्सचाही पाठिंबा मिळाला. अशा पद्धतीने आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नांची गाडी सुसाट सुरू झाली, असे तो सांगतो.

कथा सशक्त हवी

चित्रपटक्षेत्रात भरीव काही करू पाहणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे, असे सतराम सांगतो. चांगली कथा हीच तुमची खरी ताकद असते. पूर्वी लेखक-दिग्दर्शकांना गृहीत धरले जायचे. आता तसे होत नाही. तुमची कथा ही सर्वसामान्यांना जोडून घेणारी आणि वेगळे काही सांगू पाहणारी असेल तर तुम्हाला निर्माता मिळणारच, असे तो ठामपणे सांगतो. ‘हेल्मेट’नंतर अन्य चित्रपटांवरही काम सुरू झाले आहे, मात्र सध्या करोनाकाळ असल्याने जोवर प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होत नाही तोवर काही बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगत सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच लक्ष केंद्रित के ले असल्याचेही त्याने सांगितले.

‘स्टार्स’ जास्त, अभिनेते कमी…

दिग्दर्शक नवोदित असो वा प्रथितयश त्याच्या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार कोण?, या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे असते. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘स्टार्स’ जास्त आहेत आणि अभिनेते कमी…  आणि या ‘स्टार’ कलाकार  यादीत मोडणाऱ्यांकडे किमान ५०० पटकथा येऊन पडलेल्या असतात. अशा वेळी नावाजलेल्या कलाकाराला घेऊन चित्रपट करावा हे प्रत्येकाचं स्वप्न असलं, तरी  त्यांच्याकडून होकाराची वाट पाहात बसणं परवडणारं नाही, असं सतराम म्हणतो. शूजित सिरकारसारख्या दिग्दर्शकानेही ‘विकी डोनर’ हा पहिला चित्रपट के ला तेव्हा आयुषमान खुराणा हा अगदी नवोदित कलाकार होता. आधीच्या तुलनेत चित्र बदलतं आहे, नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट करण्याचे धाडस आजचे दिग्दर्शक दाखवू शकतात हेही कमी नाही, असे तो म्हणतो.