‘धग’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ हा चित्रपट आता ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. राज्य पुरस्कारांवर गारूड केलेल्या या चित्रपटातून पहिल्यांदाच मुस्लीम स्त्रियांची व्यथा मराठीत चित्रपटातून मांडण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजी लोटन पाटील यांनी दिली. लेखक राजन खान यांच्या ‘हलाल’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाने सहा राज्य पुरस्कार मिळवले आहेत. ‘धग’ नंतर शिवाजी लोटन पाटील यांनी हिंदीत एक चित्रपट केला. सोहा अली खान आणि वीरदास यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘३१ ऑक्टोबर’ या हिंदी चित्रपटानंतर ‘हलाल’ हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे. राजन खान यांची ही कादंबरी मी ४-५ वर्षांपूर्वी वाचली होती. तेव्हाच त्यावर चित्रपट करावा, असा विचार सुरू होता. या कादंबरीत मुस्लीम समाजातील स्त्रियांची आजची अवस्था, तिच्या भावभावनांना आजही महत्त्व दिले जात नाही. विवाह आणि घटस्फोट या दोन्ही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना काहीच स्थान दिले जात नाही, या सगळ्या परिस्थितीची चांगली मांडणी के ली आहे. ‘हलाल’ हा चित्रपट प्रामुख्याने ‘तलाक’ या विषयाभोवती बांधलेला आहे, असे शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितले. मुस्लीम समाजात घटस्फोट सहजी मिळतात. मात्र त्याचा सर्वात मोठा फटका स्त्रियांना बसतो. त्यांचे भावविश्वच कोसळून जाते. या ‘तलाक’चा शस्त्रासारखा वापर करून आजही स्त्रियांची जी फसवणूक केली जाते, त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतो, याचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट जरी त्या स्त्रियांची व्यथा मांडणारा असला तरी तो एक प्रकारे स्त्रिच्या आद्यस्थितीवर बोट ठेवतो, असे त्यांनी सांगितले. अमोल कागणे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रीतम कागणे या अभिनेत्रीने मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. प्रीतमचा चेहरा आणि तिचे एकूण व्यक्तिमत्त्व मुस्लीम स्त्रीशी साधम्र्य राखणारे वाटल्याने तिची या चित्रपटासाठी निवड केल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट मुस्लीम समाजावर आधारित असल्याने त्यांची देहबोली, त्यांची संस्कृती यांची जाण असणे आवश्यक होते. यासाठी गावाकडील मुस्लीम समाजाचे चित्रण करून ते कलाकारांना दाखवण्यात आले होते, असे ते म्हणाले. चिन्मय कसलेला आणि भूमिकेवर स्वत: परिश्रम घेणारा नट असल्याने त्याच्या बाबतीत फार मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र प्रियदर्शनने आत्तापर्यंत स्टॅण्डअप कॉमेडी आणि तशाच भूमिकांमधून काम केले आहे. त्याच्या लोकप्रिय प्रतिमेच्या अगदी विरुद्ध अतिशय गंभीर अशी भूमिका त्याने पहिल्यांदाच केली आहे, असेही दिग्दर्शकाने सांगितले.