कलाविश्वामध्ये आजवर अनेक विषयांवर, थोर व्यक्तींवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारितदेखील काही चित्रपटांची निर्मिती केल्याचं पाहायला मिळतं. यात ‘गांधी’, ‘गांधी माय फादर’, ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ यांसारखे अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, महात्मा गांधी स्वत: चित्रपट मनोरंजनाबाबत फारसे उत्साही नव्हते. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकच चित्रपट पाहिला होता. हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट होता, असं म्हटलं जातं. महात्मा गांधींनी १९४३ साली प्रदर्शित झालेला ‘राम राज्य’ हा चित्रपट पाहिला होता. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अभिनेत्री शोभना समर्थ यांनी सीतेची व अभिनेता प्रेम आदिब यांनी भगवान श्री राम यांची व्यक्तिरेखा साकारली होती. भगवान श्री राम यांच्या तत्वज्ञानाचा महात्मा गांधी यांच्यावर फार प्रभाव होता. हा चित्रपट राजा राम यांच्या पौराणिक कथेवर आधारित होता. त्यामुळे गांधींनी हा चित्रपट पाहिला असे म्हटले जाते. तसेच या चित्रपटाचे प्रमोशन गांधींनी पाहिलेला पहिला चित्रपट याच पद्धतीने केले गेले होते. विजय भट्ट यांनी महात्मा गांधींसाठी या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. हा चित्रपट पाहून गांधींचे सिनेमनोरंजनाबाबतचे मत बदलेल अशी अपेक्षा विजय यांना होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामात गुंतलेल्या गांधींना चित्रपट पाहाण्याची उसंत कधी मिळालीच नाही. परिणामी चित्रपट हे मनोरंजन व जनजागृतीसाठी एक उत्तम माध्यम असल्याचे त्यांना उमगलेच नाही. अशी माहिती विजय भट्ट यांनी स्वत: एका मुलाखतीत दिली होती.