मराठीच्या रुपेरी पडद्यावर खूपच कमी प्रमाणात थरारपट या प्रकारातील चित्रपट येतात. ‘चिंतामणी’ हा थरारपट प्रकारातला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रकार मुळापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असाच बनवावा लागतो. मात्र दिग्दर्शकाने हा थरारपट हास्यास्पद कसा होईल याचीच अधिक काळजी घेतली की काय, असे प्रेक्षकांना वाटल्यावाचून राहणार नाही. विशेषत: प्रमुख कलावंत जोडी चांगली असूनही पटकथेचा आणि दिग्दर्शनाचा अभाव, सादरीकरणाचा अभाव यामुळे हा थरारपट फसला आहे.
चिंतामणी, त्याची बायको आरती आणि त्यांची मुलगी किमया यांचा चाळीतील छोटासा संसार आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधित्व हे कुटुंब करते. एका य:कश्चित विवाह मंडळात म्हणे चिंतामणी नोकरी करतोय. चिंतामणी-आरती यांचा प्रेमविवाह आहे. चिंतामणीची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यामुळे मुलगी-बायको यांची हौसमौज तर सोडाच, पण तो मुलीच्या शिकवणीची फीसुद्धा भरू शकत नाही. आरती ही मूळची श्रीमंत कुटुंबातील आहे. लग्नाआधी ती कॉपरेरेट कंपनीत कामही करीत असते. लग्नानंतर मात्र ती गृहिणी बनते. रडतपडत कसाबसा आरती-चिंतामणीचा संसार सुरू आहे. सततची पैशाची चणचण, श्रीमंत घरातील बायको केल्यामुळे सतत चिंतामणी दबावाखाली वावरतोय. त्यातच त्याला भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या योजनेची जाहिरात दिसते. त्या योजनेत पैसे गुंतवून आयुष्याचे एकदाच भले करण्याचा विचार चिंतामणीच्या डोक्यात घोळू लागतात. या योजनेत चिंतामणी सहभागी होतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांभोवती चित्रपट बेतलेला आहे.
थरारपटाचा प्रकार हाताळताना रहस्याला वाव असतोच, तसा तो इथेही आहे. परंतु हा थरारपट आहे याची जाणीव प्रेक्षकाला होईपर्यंत मध्यंतर होते. मध्यंतरानंतर एकामागून एक विचित्र घटना चिंतामणीच्या आयुष्यात घडत जातात. त्याच्या मुलीचे अपहरण होते वगैरे. परंतु मध्यंतरापूर्वी अनेक दृश्ये का दाखवली जात आहेत, असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. चिंतामणीसारख्या गरीब तरुणाच्या प्रेमात पडून लग्न केल्यामुळे आरतीचे वडील तिच्याशी संबंध तोडतात. पण मग तरीसुद्धा आरतीच्या धाकटय़ा बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आरती-चिंतामणीच्या चाळीतील घरी येतात आणि चिंतामणीला मात्र लग्नाला बोलावलेले नाही, तर फक्त आरतीला लग्नाला बोलावणे केले आहे, असे सांगतात. मग वादावादी होते. हा सगळा तमाशा अख्खी चाळ पाहते. यासारखी काही अनावश्यक दृश्ये मध्यंतरापूर्वी येत असल्यामुळे प्रेक्षक प्रचंड कंटाळतो. विनोदी चित्रपटांचा नायक ही भरत जाधवची प्रतिमा सोडून गंभीर भूमिकेमध्ये भरत जाधव काम करत असताना त्याला गंभीर भूमिका साकारणाऱ्या अमृता सुभाषसारख्या अभिनेत्रीची साथ मिळालेली असतानाही पटकथा व दिग्दर्शनाच्या अभावामुळे चांगली कलावंत फळी असणारी जमेची बाजू चित्रपटकर्त्यांनी वाया घालवली आहे. मध्यंतरानंतरचे रहस्य, त्याची उकल करण्यासाठी नायकाची धडपड हा भाग उत्कंठावर्धक असला तरी सुरुवातीला थरारपटाची कोणतीच झलक प्रेक्षकासमोर येत नसल्यामुळे मध्यंतर आणि मध्यंतरानंतरचा चित्रपट असे सरळ दोन भाग पडले आहेत. लग्नापूर्वी नोकरी करणारी आरती लग्नानंतर नवऱ्याच्या गरिबीच्या संसाराला हातभार लावण्यासाठी नोकरी करीत नाही, असे तर्कविसंगत दाखविण्यामागे लेखक-दिग्दर्शकाचा हेतू समजत नाही. मध्यंतरापूर्वीच्या अनेक दृश्यांमुळे चित्रपट कंटाळवाणा आणि हास्यास्पद ठरतो.
चिंतामणी
निर्माते – कल्पना शेट्टी, संगीता बालचंद्रन
दिग्दर्शिका – संगीता बालचंद्रन
कथा – दीपक भावे
पटकथा-संवाद – किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा
छायालेखन – सुरेश सुवर्णा
संगीत – संजीव कोहली
कलावंत – भरत जाधव, अमृता सुभाष, तेजश्री वालावलकर, रुचिता जाधव, उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के, मोनिका दबडे  व अन्य.