लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर ८० आणि ९०च्या दशकातील मालिका दाखवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात करण्यात आली. त्या पाठोपाठ शक्तिमान मालिका दाखवण्याच्या मागणीनुसार ती मालिका देखील दाखवण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा शक्तिमान म्हणजेच मकुशे खन्ना चर्चेत आहेत. नुकतेच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी छोट्या पडद्यावरील क्विन एकता कपूरवर निशाणा साधला आहे.

मुकेश खन्ना यांनी नुकताच ‘मुंबई मिरर’ला एक मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी शक्तिमान मालिका पुन्हा दाखवण्यात आली नसती तर मी माझ्या मालिकेच्या पुढच्या एपिसोडची घोषणा केली असती असे म्हटले. तर दुसरीकडे त्यांनी एकता कपूरवर निशाणा साधत शक्तिमानचे नवे वर्जन २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या महाभारतासारखे नसणार असे देखील म्हटले आहे.

मुकेश यांना मुलाखतीमध्ये शक्तिमानचे नवे व्हर्जन मॉर्डन असणार का या संबंधात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या महाभारतातील द्रौपदीच्या खांद्यावर चक्क टॅट्टू होता. संस्कृती कधीच मॉडर्न होऊ शकत नाही. जेव्हा ती मॉडर्न होईल तेव्हा ती संपलेली असेल. मी महाभारताप्रमाणे शक्तिमानचा मर्डर होऊ देणार नाही’ असे मुकेश यांनी म्हटले आहे.

लवकरच मुकेश यांच्या शक्तिमान मालिकेचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. ‘गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शक्तिमानच्या सिक्वेलवर काम करत आहोत. कारण प्रेक्षकांना शक्तिमानचे पुढे काय झाले हे जाणून घ्यायचे आहे’ असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. मालिकेसोबतच शक्तिमानवर एक चित्रपट काढण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.