गेल्या काही दिवसांपासून अभिनेते मुकेश खन्ना हे चर्चेत आहे. त्यांनी कपिल शर्मामध्ये जाण्यास नकार देत कार्यक्रमावर टीका केल्यामुळे या चर्चेला तोंड फुटलं होतं. मुकेश खन्ना यांनी आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी "आज जर बाळासाहेब असते, तर मुंबईत अशा घटना घडल्या नसत्या," असं म्हटलं आहे. "आज मला अशा व्यक्तीची आठवण येत आहे, ज्यांच्यासोबत आज मुंबईचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यांच्यासोबत हिंदुत्वाचं नाव जोडलं गेलं आहे. तुम्हाला कल्पना आलीच असेल की, मी कुणाविषयी बोलत आहे. मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलत आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना एकदाच भेटलो आहे. पण लहानपणापासून त्यांना पाहूनच मी मोठा झालो आहे. कारण मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो आहे," असं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, 'मुंबईचा मी विकास पाहिला आहे. मी मुंबईमधील ज्या घटना पहिल्या आहेत आणि कसं शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईवर कंट्रोल होता, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. कॉलेजच्या आयुष्यापर्यंत हे मी पाहात आलो आहे. जर मुंबईमध्ये एखाद्या व्यक्तीनं घोषणा केली मुंबई बंद आहे, तर दुकानं बंद करणारे आधी बघायचे की, यामध्ये शिवसेनेचा सहभाग आहे का? आणि जर असेल तर चुपचाप दुकानं बंद केली जायची. पण जर एखाद्या दुसऱ्या पक्षानं मुंबई बंद केली, तर अनेकजण याकडे दुर्लक्ष करायचे. त्यांच्यात (बाळासाहेबांकडे) इतकी ताकद होती,' असं खन्ना यांनी सांगितलं. 'त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पदाची मागणी किंवा इच्छा बाळगली नाही. त्यांची जर इच्छा असती, तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अगदी सहजपणे झाले असते. पण त्यांनी कधीच अशी इच्छा ठेवली नाही. त्यांच्यामध्ये कोणतीही समस्या सोडवण्याची ताकद होती. मला त्यांची सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडत होती, तर मी म्हणजे गर्वाने सांगा की मी हिंदू आहे. आपण हिंदू असूनही आज आपल्याला सांगताना लाज वाटते. आज बाळासाहेब जिवंत असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आज ज्याप्रकारे मतभेद सुरु आहेत ते झाले नसते.' निवेदनाचा समारोप करताना खन्ना म्हणाले, जर आज बाळासाहेब असते, तर मुंबईमध्ये अशा घटना घडल्या नसत्या. 'मुंबई बाळासाहेंना सर्वात जास्त मिस करत आहे. बाळासाहेब जर जिवंत असते तर मुंबई आज वेगळी असती. आज मुंबईमध्ये अशा घटना घडल्या नसत्या. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जे काही होत आहे, त्यामुळे लोकांना बाळासाहेबांची आठवण येत आहे. आज ते असते तर तुम्ही पाहात असलेल्या घटना घडल्या नसत्या' असं त्यांनी म्हटले आहे.