आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायक मुकेश यांचं निधन होऊन आज अनेक वर्ष लोटली. मात्र त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते आजही आपल्याबरोबर आहे. त्यांची गाणी आजही प्रत्येक तरुणाच्या ओठी ऐकायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला असून अभिनेता राज कपूर यांच्या बऱ्याच गाण्यांना मुकेश यांचाच आवाज आहे. मुकेश यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी दिल्लीत झाला. त्यांचं पूर्ण नाव मुकेश चंद्र माथुर असं होतं. आपल्या आवाजाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवूडला वेड करणाऱ्या मुकेश यांनी त्यांच्या गायनाची सुरुवात एका लग्नात गाऊन केली होती. एका लग्नामध्ये मुकेश यांना मोतीलाल या त्यांच्या नातेवाईकाने पाहिलं आणि त्यांनी मुकेश यांना मुंबईमध्ये येण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे मोतीलाल यांनीच मुकेश यांना प्रथम मुंबईमध्ये आणलं आणि त्यांच्या रियाजाचीही देखील सारी सोय केली. १९४५ मध्ये 'पहली नजर' या चित्रपटामधून त्यांनी त्यांच्या पार्श्वगायनाची सुरुवात केली. 'दिल जलता है तो जलने दे' हे त्यांचं चित्रपटसृष्टीतील पहिलं गाणं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस गाणी गायली. तसंच मुकेश यांनी 'जीना यहा मरना यहा', 'जीना इसी का नाम है', 'सजन रे झूठ मत बोलो' आणि 'दोस्त दोस्त ना रहा' यासारख्या गाण्यांचं पार्श्वगायन केलं आहे. गायनाबरोबरच त्यांनी अभिनय क्षेत्रातही त्यांची छाप उठविली असून निर्दोष या चित्रपटामध्ये ते झळकले होते. दरम्यान, १९७६मध्ये अमेरिकेमध्ये असताना हदयविकाराच्या झटक्याने मुकेश यांचं निधन झालं. मुकेश यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच त्यावेळी धक्का बसला होता.