अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई हायकोर्टाकडून अद्याप कोणत्या प्रकराचा दिलासा मिळालेला नाही. कंगनाने मुंबई हायकोर्टात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळालेला नाही. येत्या २५ जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने काही आक्षेप नोंदवले आहेत. अभिनेत्रीने चुकीची याचिका दाखल केली असून पासपोर्टची अंतिम तारीख जवळ आल्यानंतर याचिका का दाखल केली गेली? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. यानंतर न्यायालयाने कंगनाला पुन्हा नवी याचिका दाखल करण्याचे निर्देश देते सुनावणी २५ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंगना रणौतला तिच्या 'धाकड' या सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हे देखील वाचा: मड बाथसाठी मोजले तब्बल २० हजार, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स काय म्हंटलं होतं याचिकेत? कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केलीय. यात “कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे.” यासाठी कंगनाला प्रवास करणं महत्वाचं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. तसचं कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. परदेशात प्रोडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचं तिथे पोहचणं महत्वाचं आहे असं म्हणतं पासपोर्ट रिन्यू करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.