बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलीसांत तक्रारदेखील दाखल केली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले आहे. तसंच त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पायल घोष हिनं केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी अनुराग्य कश्यपला समन्स बजावले असून उद्या (गुरूवार) सकाळी ११ वाजता मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे. “जर अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन,” अशी धमकी पायल घोषनं यापूर्वी पोलिसांना दिली होती.

पायलचे वकिल नितिन सातपुते यांनी यापूर्वी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली होती. “आम्ही अनुराग विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. जर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही तर पायल उपोषणाला बसेल.” असंही ते म्हणाले होते.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्वीट पायलनं केलं होतं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्वीट अनुराग कश्यपने केलं होतं.