‘यशराज फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत साकारणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामध्ये मोठे फेरबदल झाल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शन विभागात हे फेरबदल करण्यात आले असून, सध्या त्याविषयीच्याच चर्चा चित्रपटवर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच शंकर- एहसान- लॉय हे त्रिकूट या चित्रपटाला संगीत देणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, आता मात्र ते या प्रोजेक्टचा भाग नसून, त्यांच्याऐवजी एका मराठमोळ्या संगीतकार जोडीच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध संगीतकार त्रिकूटाच्या एक्झिटनंतर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये अजय- अतुल या संगीतकार जोडीला एण्ट्री मिळाली आहे. सध्याच्या घडीला हा मोठा फेरबदल असल्याचंही म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल करण्यात आले. त्यावेळी शंकर- एहसान- लॉय यांनी काम करण्यास सुरु केलेल्या चालींमध्ये काही बदल करण्यास त्यांना सुचवण्यात आलं. पण, त्यांच्याकडे तितका वेळ नसल्यामुळे या चित्रपटातून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. संगीत क्षेत्रात प्रेक्षकांच्या आवडीचं हे त्रिकूट ‘ठग्स…’ मधून बाहेर पडताच अजय- अतुलचं नाव या बिग बजेटसोबत जोडलं गेलं आहे.

याविषयी ‘स्पॉयबॉय ई’ला दिलेल्या माहितीत एहसान म्हणाला, ‘हो आम्ही त्या प्रोजेक्टचा भाग होतो. पण, स्क्रीप्टमध्ये काही बदल केल्यामुळे परिस्थिती बदलली. वेळेअभावी आम्ही काही गोष्टींची पूर्तता करु शकलो नाही. त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट सोडला’. या त्रिकूटानंतर अजय- अतुलची ‘ठग्स…’मध्ये थेट एण्ट्री कशी झाली असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना? शंकर- एहसान- लॉय यांनीच निर्मात्यांना या मराठमोळ्या संगीतकार जोडीचं नाव सुचवलं. याविषयीच सांगताना एहसान म्हणाला, ‘अजय- अतुल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान असतो. त्यामुळे आम्ही त्यांचं नाव पुढे केलं. त्यांच्या पुढच्या वाटालीसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देऊ इच्छितो.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटसुद्धा गतकाळातील काही घटनांचा आधार घेत साकारला जात असून, त्याचं माल्टामधील चित्रीकरण पूर्ण झालं आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट अनेकांचं लक्ष वेधतोय.