पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असून 'पानिपत' असंच चित्रपटाचं नाव असणार आहे. अभय कांबळी यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्याचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. विशेष म्हणजे जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके या चित्रपटातून संगीत दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचे पुत्र असल्याने संगीत त्यांच्या रक्तातच आहे. 'लक्ष्मीची पाऊले', 'पुत्रवती', 'विश्वविनायक', 'घराबाहेर', 'हृदयस्पर्शी' यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव ते चित्रपटसंगीतापासून लांब राहिले होते. परंतु आता 'पानिपत' या भव्य-दिव्य चित्रपटाला ते संगीतबद्ध करीत आहेत. चित्रपटातील तीन गाण्यांचं ध्वनिमुद्रण झालं असून त्यातील दोन गाण्यांना सुखविंदर सिंग आणि रिचा शर्मा या बॉलिवूडमधील प्रतिष्ठित गायकांचा आवाज लाभला आहे. पुढच्या वर्षी दिवाळीला 'पानिपत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा : 'मेमरी कार्ड'मधील ते गाणं जावेदसाठी खास औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारताबाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले आणि १४ जानेवारी १७६१ ला पानिपतमध्ये तिसरे घनघोर युद्ध झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला. याच युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.