दुसऱ्या कलाकाराचा किंवा दिग्दर्शकाचा चित्रपट कितीही चांगला असला, तरी त्याला जाहीरपणे चांगला म्हणण्याचा ‘चांगुलपणा’ दुर्मिळ झाला आहे. स्पर्धेच्या युगात हे सारे चालणारच, पण पुण्यात शनिवारी काही निराळेच घडले. स्पष्टोक्तेपणाची ख्याती असलेल्या अभिनेता नाना पाटेकरला एका मराठी चित्रपटाने भुरळ घातली. त्याला तो मनापासून आवडला. नानाचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही, पण आवडलेला हा चित्रपट इतरांनाही पाहण्यास सांगावे, असे त्याच्या मनात आले अन् त्याने ते जाहीरपणे सांगितलेही.. किरण यज्ञोपवीत यांनी दिग्दर्शित केलेला ‘सलाम’ हा तो चित्रपट.. नानाबरोबरच चित्रपट निर्माता श्रीरंग गोडबोले यांनीही दिलखुलासपणे या चित्रपटाचे कौतुक केले.
नानाने शुक्रवारी रात्री हा चित्रपट पाहिला. ‘मला या सिनेमाने लहान केले,’ अशीच त्याची प्रतिक्रिया होती. गोडबोले यांनाही चित्रपट भावला. आपण त्यासाठी काहीतरी करावे. हा चित्रपट इतरांना पाहण्यासाठी आवाहन करावे, असे दोघांच्याही मनात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी चक्क पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले. नाना म्हणाला ‘‘सिनेमा पूर्ण पहायचा म्हटला की कंटाळा येतो. पण, या सिनेमाने मला खूप शिकविले. खूप काही हरवले होते, ते मला गवसले. चित्रपट पाहताना खूप संवेदनातून गेलो. आनंद व अनुभूतीच्या कुठेतरी पल्याड घेऊन जातो. काय हरवले, कशामुळे हरवले ते सांगतो. आजी जशी गोष्ट सांगते ना, तसे या सिनेमाने केले. म्हणूनच चांगल्याला चांगले बोलण्याचा आनंद मोठा असतो. हा सिनेमा म्हणजे आयटम साँगच्या जमान्यात मुक्तछंदातील एक छान कविता आहे. आपण बाहेरच्यांचे कौतुक करतो, पण आपल्याकडचेही चांगले पाहिले पाहिजे.’’
मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगले दिवस आले आहेत, असे सांगून नाना म्हणाला, ‘‘मराठीत खूप चांगले लोक आले आहेत. हिंदूीपेक्षा उत्तम अभिनय करणारी मंडळी मराठीत आहेत. आता कल्पनेला किंमत आली आहे. आता पिढीही बदलते आहे, त्यानुसार प्रेक्षकही बदलतो आहे. त्यांच्या आनंदाची व्याख्या बदलली आहे. जाणिवाही बदलल्या असल्याने त्यानुसार चित्रपटातून त्यांना तेही मिळाले पाहिजे.’’