देशभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांसाठी दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर केले जातात. करोनाच्या संकटामुळे 2020 सालात अनेक सिनेमांचं प्रदर्शन रखडलं. त्यामुळे यंदा 2019 या सालातील सिनेमांसाठी पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठीचा बोलबाला पाहायला मिळाला. अनेक पुरस्कार मिळवलेला समीर विध्वंस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या सिनेमाची देखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांच्या श्रेणीत 'आनंदी गोपाळ' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी देखील या सिनेमाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. ज्या शतकात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या एकोणिसाव्या शतकात आनंदी गोपाळ जोशी बोटीने अमेरिकेला गेल्या. तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या. चार वर्ष परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतल्या. त्यांचा हा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. या सिनेमात आनंदीबाईंच्या भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद आणि गोपाळराव यांच्या भूमिकेतील ललित प्रभाकर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाने विविध श्रेणीत अनेक मानाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.