अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर मत व्यक्त करणारे विश्वस्त शरद पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र गुरुवारी समाजमाध्यमांवर झळकल्याने अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या पायउताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ‘विरोधी गटाने घेतलेल्या १८ फेब्रुवारीच्या विशेष बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे आम्हाला वाटते,’ असे मत पत्रात विश्वास्तांनी दिले आहे. तर ‘हा निर्णय नसून विश्वास्तांनी मत व्यक्त केले आहे. आम्हीही आमची बाजू मांडू आणि ती घटनात्मकच असेल,’ अशी प्रतिक्रिया कांबळी यांनी दिली आहे. नाट्य परिषद अध्यक्षांचा निषेध करत विरोधी गटाने १८ फेब्रुवारीला विशेष बैठक बोलावली. ज्यामध्ये नरेश गडेकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निर्णयावर धर्मादाय आयुक्ताची संमती येण्याआधीच विश्वास्तांना हा निर्णय मान्य असल्याचे पत्र समाज माध्यमांवर आले. परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी काही नियामक मंडळ सदस्यांना घेऊन विश्वास्त शरद पवार आणि शशी प्रभू यांची १२ मार्च रोजी भेट घेतली. ‘विरोधी गटातील नियामक मंडळ सदस्यांनी घेतलेल्या १८ फेब्रुवारीच्या विशेष बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी व्हावी असे आम्हाला वाटते. तसेच विश्वास्तांबरोबर नियामक मंडळाची सभा होणे आवश्यक आहे,’ अशा आशयाचे पत्र या भेटीत मंजूर करण्यात आले. त्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे. विश्वस्तांचे द्वंद्व ऑक्टोबरअखेरीस झालेल्या विश्वास्तांच्या बैठकीत सहकार्यवाह सतीश लोटके यांच्यावर कारवाई करा, असे सांगण्यात आले होते. त्याच सतीश लोटके यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाल्याने विश्वास्तांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शशी प्रभू यांच्या भूमिकेवर संशय ‘परिषदेच्या अंतर्गत बाबींचे हे पत्र विश्वास्त शशी प्रभू यांनी माध्यमांना देऊन घटनेची पायमल्ली केली आहे. विश्वास्तांसोबत बैठक व्हावी अशी मागणी परिषदेने विश्वास्त शशी प्रभू यांना २५ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे केली होती. त्याचे अद्याप उत्तर आलेले नाही. दुसरीकडे अशा परस्पर भेटी घेऊन निर्णय घेणे आणि माध्यमांना पोहोचवणे योग्य आहे, का याचा विचार व्हायला हवा,’ असा खुलासा परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी के ला आहे. तसेच नाट्यसंकुलाच्या बांधणीतील त्रुटींबाबतही त्यांना अनेक पत्र दिलेली आहे. त्याचेही उत्तर इतक्याच तत्परतेने द्यावे, असे सूचक विधान कदम यांनी केले आहे. विश्वस्त शरद पवार यांच्या मतांचा आदर आहे. पण या पत्रात त्यांनी मत व्यक्त केले आहे, निर्णय दिलेला नाही. ऑक्टोबरमध्ये झालेली अधिकृत बैठक सतीश लोटके यांनी अवैध ठरवली होती. मग घटनेनुसार ज्या बैठकीत एकही पदसिद्ध सदस्य नसेल त्याला बैठक म्हणावी का असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अनेक विषय खासगी आणि न्यायप्रविष्ट आहेत. ज्याची चर्चा विश्वस्तांसोबत होईल. - प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद