‘सत्यमेव जयते’च्या या वर्षांतील तिसऱ्या आणि अंतिम पर्वाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आमिरने फेसबुक आणि ट्विटरवर ‘सत्यमेव जयते’च्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रसिद्ध केला आहे.
यावेळच्या पर्वाच्या स्वरूपात काही वेगळे बदल करण्यात आल्याची माहिती आमिरने दिली होती. या शोमध्ये आमिर काही लोकांशी खुद्द संवाद साधणार आहे. शिवाय, काही सेलिब्रिटी कलाकारही या शोमध्ये खास हजेरी लावणार असून त्या त्या समस्यांविषयीच्या चर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र हे कलाकार कोण आहेत हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. शोमध्ये जे कलाकार सहभागी होतील ते ‘सत्यमेव जयते’च्या किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या प्रसिद्धीसाठी सहभागी होणार नाहीत. आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या त्याच्या शोच्या पहिल्या पर्वातून भारतातील स्त्री-भ्रूण हत्या, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा संबंधीची प्रकरणे, खाप पंचायत आणि समाजातील अन्य संवेदनशील प्रश्नांना वाचा फोडली होती.