अनलॉकदरम्यान हळूहळू अनेक गोष्टींवरचे निर्बंध शिथिल केले जाऊ लागले. लॉकडाउनदरम्यान घरांमध्ये बंदिस्त असलेले सेलिब्रिटीसुद्धा आता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले. सोशल मीडियावर एकानंतर एक अशा सेलिब्रिटींच्या फोटोंची जणू रांगच लागली आहे. एकीकडे देशातील करोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढत असताना, बेरोजगारीची टांगती तलवार असताना, इंडस्ट्रीला मोठा फटका बसलेला असताना हे सेलिब्रिटी अशाप्रकारे ‘मालदीव व्हेकेशन’चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर अभिनेता व निर्माता निखिल द्विवेदीने संताप व्यक्त केला आहे.

पत्रकार बरखा दत्त यांच्या ट्विटला उत्तर देताना निखिलनं लिहिलं, ‘चित्रपटसृष्टीवर होणाऱ्या टीकांबद्दल मग आपल्याला अचानक आश्चर्य वाटू लागतं. आपण इतके स्वमग्न झालोय की आजूबाजूला काय घडतंय तेसुद्धा कळत नाहीये. मी हे खात्रीने सांगतो की ते सर्व (मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करणारे सेलिब्रिटी) भावनाहीन नाहीत, कोणीच नाही. ते फक्त मूर्ख आहेत.’ सोशल मीडियावर सेलिब्रिटी पोस्ट करत असलेल्या व्हेकेशनच्या फोटोंवर बरखा दत्तने नाराजी व्यक्त केली होती.

सोनाक्षी सिन्हा, रकुल प्रीत सिंह, तारा सुतारिया आणि आदर जैन हे सध्या मालदीवमध्ये आहेत. तर तापसी पन्नू, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, मौनी रॉय, नेहा धुपिया आणि अंगद बेदी, काजल अगरवाल हे सेलिब्रिटी नुकतेच मालदीवला जाऊन आले.

गेल्या आठवड्यात निखिलच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं. निखिल लवकरच श्रद्धा कपूरसोबत एका चित्रपटात झळकणार आहे.