नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने अक्षरशः लोकांना वेड लावले. सिनेमा येऊन अनेक महिने जरी लोटले असले तरी आर्ची आणि पर्श्याची क्रेझ काही कमी झाली नाही. ध्वजारोहण असो किंवा शक्तीप्रदर्शनासाठी कोण्या नेत्याने व्यासपीठावर सैराट कलाकारांना नेणे. जिकडे आर्ची आणि परश्या आले तिथे आजही गर्दी हमखास येणार हे नक्की.
एका दिवसात नशिब पालटतं याबद्दल आपण फक्त ऐकलं होतं. पण, आर्ची आणि परश्याच्या आयुष्यात मात्र असंच काहीसं झालं आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्य या एका सिनेमाने पुरतं पालटून गेलं. एवढं की आता त्यांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांशिवाय जाणंही शक्य नाही. तिच्या प्रत्येक गोष्टीविषयीच प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. दहिहंडीलाही अनेक ठिकाणी यावेळी आर्चीचीच क्रेझ पाहायला मिळाली.
काही दिवसांपूर्वी तिने शाळाही रुजू केली होती. पण तिची क्रेझ मात्र काही कमी झाली नाही. त्यामुळे तिने आता शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती शिक्षण सोडणार नाहीए. पण शाळेत गेल्यावर मुलांची तिच्याच भोवती जास्त गर्दी वाढते. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिंकूच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा १७ नंबरच फॉर्म भरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यामुळे ती तिची १० वीची परिक्षा बाहेरुनच देणार आहे अशी चर्चा आहे.