बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीवर विनम्रतेने असहमती दर्शविली आहे. आपण भारतरत्न मिळण्याच्या योग्यतेचे नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले आहे.
अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषणऐवजी भारतरत्न जाहीर केला पाहिजे होता, या आशयाचे ट्विट ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ यांनी “ममता दीदी, या पुरस्कारासाठी मी स्वत:ला त्या योग्यतेचा समजत नाही. देशाने जे दिले आहे त्याने मी खूपच सन्मानित झालो आहे,” असे ट्विट केले आहे.
अमिताभ यांना देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने अर्थात पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे.