आगामी चित्रपट उडता पंजाबवरून अनेक वाद सध्या सुरु आहेत. या चित्रपटाच्या वादावरून सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभारावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान, अभिनेता इरफान खान याने ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकाला आपला पाठींबा दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध दर्शवत, संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड बनला असल्याचे त्याने म्हटले आहे. आगामी मदारी चित्रपटातील दमा दम गाण्याच्या लॉन्चवेळी तो बोलत होता.
उडता पंजाब या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने ८४ कट्स सुचविले असून त्याविरोधात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी पुढे आले आहेत. सेन्सॉर बोर्डाविरुद्धच्या या लढ्यात उतरलेला राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिनेता इरफान म्हणाला की, प्रत्येक क्षणाला अनेक घडामोडी घडत असतात. त्या सर्वच आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. काही नियतकालिकांनी या राज्याच्या गंभीर समस्येवर लिहले असून, त्या समस्येच्या गांभीर्यतेवर भाष्य केले. आज १० वर्षांनंतर जर त्यावर चित्रपट बनविला गेला, तर त्यावर इतका मोठा वाद निर्माण केला जातोय. आपला संपूर्ण देशचं सेन्सॉर बोर्ड बनला आहे. आपल्या चित्रपटसृष्टीकडून सरकारला चार हजार कोटी रुपये कर मिळतो. याबदल्यात सरकारने निदान आम्हाला शाबासकी तरी द्यायली हवी. महेश भट म्हणाले होते की, त्यांनी ४० वर्षांपूर्वी केलेला चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. आपण झोपा काढत आहोत का?
आपल्याकडे एखादा विषय समोर आला की त्यावर लगेचचं मोठा वाद निर्माण केला जातो. यास आपण गंभीरपणे घेऊन संपूर्ण चित्रपटसृष्टीने याविरुद्ध एकत्र आले पाहिजे. हे सेन्सॉर बोर्ड आहे की प्रमाणपत्र बोर्ड हेच मला कळतं नाहीए. हे प्रमाणपत्र बोर्ड असून ते सेन्सॉर बोर्ड नाही. त्यांचे काम चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्याचे नसून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे आहे. हे नियम ब्रिटीशांनी केले असल्यामुळे कुणा एकाला वैयक्तिक दोष देऊ नये. ब्रिटीशांनी आपल्यावर सत्ता गाजविण्यासाठीचं तेव्हा नियम केले होते. हे नियम आता दुरुस्त करण्याची गरज आहे.