होळी हा रंगांचा सण आहे आणि बॉलिवूड कलाकार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात. जावेद अख्तर, अनिल कपूर, अमिताभ बच्चन आणि एकता कपूर होळीच्या निमित्ताने मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करतात. पण सध्या जगभरात सुरु असलेल्या करोना व्हायरसमुळे कलाकार यंदा होळी साजरी करणार नसल्याचे समोर आले आहे. पण असे अनेक कालाकार आहेत जे होळी साजरी करतच नाही. यामध्ये चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जौहरचा देखील समावेश आहे.

एका रिअॅलिटी शोमध्ये करण जौहरने होळी न खेळण्यामागचे कारण सांगितले होते. ‘जेव्हा मी १० वर्षांचा होतो तेव्हा अमिताभ सरांच्या घरी होळीच्या दिवशी गेलो होतो. मला रंगाची आणि होळी खेळण्याची भीती वाटते असे मी तेथे असलेल्या सर्वांना सांगितले होते. पण जेव्हा ही गोष्ट अभिषेकला कळाली तेव्हा तो बाहेर आला आणि त्याने मला रंगाने भरलेल्या पाण्यात ढकलले. या घटनेनंतर माझ्या मनात आणखी भिती निर्माण झाली. त्यानंतर मी आजपर्यंत कधीच होळी खेळलो नाही’ असे करण म्हणाला.

त्यानंतर करणने आणखी एक किस्सा सांगितला. ‘लहानपणी माझ्या कॉलनीमधली मुलं मला सिल्वर रंग लावण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी तेथून पळून जायचो. पण पळताना कधीकधी मी पडायचो आणि मला दुखपत व्हायची. मी अनेकदा त्यांच्यासोबत भांडण देखील केले’ असे करण पुढे म्हणाला.