१६४ वर्षांपूर्वी पहिली रेल्वे मुंबईत धावली. गेल्या रविवारी १६ एप्रिलला या रेल्वेला १६४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गायिका व संगीतकार पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या पहिल्यावहिल्या गाडीची आठवण करून देणारे खास गाणे गायले. त्यांनीच स्वरबद्ध केलेले शुभदा सुभेदार लिखित ‘कोकणकन्या’ हे गीत त्यांनी समाजमाध्यमांवर प्रकाशित केले. त्यांच्या ‘मेघा रे’ या अल्बममध्ये या गीताचा समावेश आहे. ते गीत रसिकांना उपलब्ध क रून देताना त्यांनी या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला. या गीतातून कोकणकन्येची सफर करताना गोमंतकाच्या हिरवाईने नटलेला आपला हृदयातील कोपरा जागा होतो. ऐन उन्हाळ्यात वैशाख महिन्यात दिवसाच्या कोणत्याही प्रहरात या गीताचे स्वर कानी आले तर या कोकणकन्येने आपण एकदा तरी आपल्या पंढरीला म्हणजेच माहेरी जावे अशी अनामिक ओढ लागते. यातील नादमय सुरांची वाट व शब्दसंपदेच्या जोरावर पद्मजा फेणाणी यांनी माहेरवाशिणीला असणारी आईच्या भेटीची अनावर ओढ रसिकांपर्यंत पोहोचवली आहे. काजूच्या वनात, माडांच्या ओळीत, मासोळी जाळ्यात, िशपले वाळूत, आमराईचा मंद सुवास तर आहेच पण पाश्चात्त्य संगीताचा अधूनमधून डोकावणारा वाद्यमेळ त्यातून ऐकू येणारा चर्चमधील घंटेचा आवाज, गोव्यातील ख्रिश्चन संस्कृती तसेच तिथल्या आदिवासींनी जपलेल्या लोकसंगीताचा वाद्यमेळ आपल्याला कोकणकन्येत बसवून थेट गोमांतकाच्या रमणीय परिसरातच घेऊन जातो. या गाण्याला श्रोत्यांनी समाजमाध्यमांवर मनापासून आणि भरभरून दाद दिल्याचे पद्मजा फेणाणी यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले. ‘कोकणकन्ये’च्या प्रवासाची ही गंमत गाण्यातून ऐकताना खूप आनंद झाला असं सांगणारे अनेक संदेश, दूरध्वनी आपल्याला आल्याचे त्यांनी सांगितले. घरबसल्या निसर्गात भटकंती केल्याचा अनुभव तुम्ही आम्हाला दिलात. रेल्वेचा हॉर्न ,घंटा, गाडीच्या समरस गाण्याची गती व त्यात कोकणच्या निसर्गाचं यथार्थ दर्शन, डोंगर व दरीप्रमाणे स्वरांचे चढ-उतार व सुमधुर आवाजातील मधुर गायन यामुळे कोकणकन्येचा हा सूरमयी प्रवास लोकांना भावला असल्याचे त्यांनी सांगितले. १६४ वर्षांपूर्वी ठाणे-मुंबई पहिली रेल्वे धावली. त्याची आठवण करताना ‘कोकण कन्या’ या गाण्यातून रेल्वेच्या या सफरीची आणि कोकणातून वळणावळणाने जाताना दिसणाऱ्या निसर्गाच्या आनंदाचा पुन:प्रत्यय रसिकांना द्यावा, हाच उद्देश होता, असेही त्या म्हणाल्या.