अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पाटणा पोलीस सुरुवातीला टाळाटाळ करत होते अशी माहिती सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी दिली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांनी पोलिसांना सर्व प्रकरण समजावून सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, असं सुशांतचे वकील म्हणाले. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली नसल्याचंही वकिलांनी स्पष्ट केलं. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तक्रारीत रियाने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. Patna Police was a little hesitant but CM Nitish Kumar & Minister Sanjay Jha explained the matter to them and FIR was registered. We want that the matter be investigated by Patna Police. The family has not demanded for CBI investigation yet: Lawyer of #SushantSinghRajput's father — ANI (@ANI) July 29, 2020 सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे आरोप- तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”. आणखी वाचा : अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे प्रयत्न सुरू पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”. “सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.