सुशांतच्या जिवाला धोका आहे, हे फेब्रुवारी महिन्यातच पोलिसांना सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. असा आरोप सुशांत सिंह राजपुतच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर अभिनेत्री पायल रोहतगी हिने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांवर जोरदार टीका करत ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न तिने विचारला आहे. पायलने एका युट्यूब व्हिडीओद्वारे सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, "मुंबई पोलीस ही जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस फोर्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले होते. परंतु इतके हुशार पोलीस सुशांत प्रकरणात असे का वागतायत? सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतच्या जिवाला धोका आहे, हे फेब्रुवारी महिन्यातच पोलिसांना सांगितलं होतं. परंतु तरीही त्यांनी काहीही कारवाई केली नाही. मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीला देखील मोकाट सोडलं. बिहार पोलिसांचं आगमन होताच सुशांत प्रकरणाला खरा वेग मिळाला. मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला का वाचवण्याचा प्रयत्न करत होते?" असे प्रश्न विचारत पायलने मुंबई पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. Sushant father exposed to Mumbai police. "On Feb 25, I informed Bandra Police that he's in danger. He died on June 14 & I asked them to act against people named in my Feb 25 complaint. No action taken even 40 days after his death. So I filed FIR in Patna.#MahaGovtExposedInSSRCase pic.twitter.com/byZnbkJtIy — Pushpendra Kulshreshtha (@iArmySupporter) August 3, 2020 सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे १. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे. २. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. ३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे. ४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला. ५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती. ६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. ७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं. ८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही. ९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. १०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.