सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना प्रश्नात टाकणारे एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये ‘आज एका नव्या आणि अपरिचित क्षेत्रात पाऊल टाकत आहे. याआधी मी अशा क्षेत्रात कधीच पदार्पण केले नव्हते. त्यामुळे या नव्या क्षेत्राविषयी प्रचंड कुतूहल आणि तितकीच धाकधूकही आहे. नव्या बदलासाठी तयार रहा’ असे म्हणत अक्षयने हे ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अक्षय नक्की काय करणार असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

अक्षयचे हे ट्विट पाहताच अनेक चाहत्यांनी अक्षय निवडणुकांमध्ये सहभागी होणार असा निष्कर्ष लावण्यात आला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी अक्षय जे काही करणार असेल ते योग्यच असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर काही लोकांनी अक्षयच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक चाहत्यांनी तर ‘तुमच्या पेक्षा जास्त कुतूहल आणि चिंता आम्हाला आहे’ असे ट्विट केले.

अभिनेता अक्षय कुमार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच चित्रपटात अक्षयसह कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय आणि कतरिना ही जोडी तब्बल ९ वर्षानंतर एकत्र दिसणार आहे.