सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ही दोन्ही गाणी कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. ‘सेन्सॉर बोर्डा’ने ही गाणी प्रमाणित केलेली आहेत आणि चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे, असे नमूद करत न्यायालयाने ही गाणी वगळण्यास नकार दिला. मात्र न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवत त्याबाबत केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या दोन गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी हेमंत पाटील यांनी याचिकेद्वारे केली होती. या चित्रपट व गाण्यांमधून पेशवा बाजीराव, त्यांची पहिली पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी यांचे कशाप्रकारे विकृत दर्शन घडविण्यात आल्याचा आल्याचा दावा करण्यात आला. इतिहासात जी गोष्ट झालीच नाही, ती गोष्ट या दोन गाण्यांद्वारे दाखवण्यात आली आहे. ही गाणी अशीच प्रसिद्ध झाली तर इतिहास असाच होता, असा लोकांचा समज होईल. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटात अशाप्रकारच्या नाटय़ाद्वारे इतिहासाची तोडमोड केली जात आहे. त्यामुळे गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.