पहिलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आठवणी सर्वांसाठीच खास असतात. याला बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. ‘पिंक’, ‘मनमर्जियाँ’, ‘मुल्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने एका कार्यक्रमात तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. नववीत असताना पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये असल्याचं तापसीने सांगितलं.

‘माझ्या पहिल्या रिलेशनशिपची सुरुवात मी नववीत असताना झाली. माझ्या इतर मित्रमैत्रिणींच्या तुलनेत माझी सुरुवात थोडी उशिराच झाली असं मला वाटलं होतं. दहावीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं कारण देऊन त्याने ब्रेकअप केलं होतं. त्यावेळी मोबाइल फोन नव्हते. त्यामुळे घरामागे असलेल्या एका पीसीओवरून त्याला फोन करून मी रडायची. मला का सोडून जात आहेस, असा प्रश्न मी त्याला विचारायची,’ अशा शब्दांत तापसीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

प्रेम, नाती यांबद्दल ती पुढे म्हणाली, ‘माझी सूर्यरास सिंह आहे. १ ऑगस्ट रोजी माझा जन्म झाला. सिंह ही रास आणि १ तारखेचं समीकरण खूप वाईट आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मला केंद्रस्थानी राहायला आवडतं. जर माझा पार्टनर अगदी सहजतेने माझ्या नियंत्रणात येत असेल, तर मला त्यात काही महत्त्वपूर्ण वाटत नाही. मला माझ्यासारखं कोणीतरी हवं आहे. ज्याच्याकडे पाहून माझ्या मनात आदर निर्माण होईल असा व्यक्ती मला हवा आहे.’

‘मी जेव्हा जेव्हा रिलेशनशीपमध्ये होते, तेव्हा मला वाटलं की हेच ते, जे मला हवं आहे. हाच तो व्यक्ती आहे. मी त्याच्यासोबत माझ्या आयुष्याचं, मुलाबाळांचं चित्र रंगवते. पण काही दिवसांतच माझा स्वप्नभंग होतो. तेव्हा मला वाटतं की कदाचित हा तो व्यक्ती नसेल,’ असं तिने सांगितलं.