करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता 'आरोग्यत्सव' साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे अभिनेत्री पूजा भट्ट हिने कौतुक केले आहे. हा अत्यंत प्रेरणादायी निर्णय असल्याचं तिने म्हटलं आहे. Truly commendable and must be applauded! We are what we do not what we say we will do. Wish more people could take Inspiration from this truly wise and humane step taken! 'जय जय महाराष्ट्र माझा' — Pooja Bhatt (@PoojaB1972) July 1, 2020 "खरंच हा एक कौतुकास्पद निर्णय आहे. तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल. आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेत अशी मदत करायला हवी. जय जय महाराष्ट्र माझा." अशा आशयाचे ट्विट करुन पूजाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी लालबागचा राजा ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे. @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @kishoripednekar @AnilDeshmukhNCP@MumbaiPolice pic.twitter.com/m7W2Nh7Bhs — Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) July 1, 2020 लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवणार आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.